Do Aur Do Pyaar Movie Review :  प्रेम असले किंवा प्रेमात नेहमी तुम्हाला यश मिळते का? जर असे असेल तर दिलीप कुमार-मधुबाला, राज कपूर-नर्गिस यांच्या प्रेमकथा या अपूर्ण नसत्या किंवा त्या दंतकथा म्हणून त्यांच्या चर्चा झाल्या नसत्या. लग्नानंतर नात्याचा शेवट आनंदी होतो, हे सर्व पूर्वीच्या चित्रपटांमध् दाखवले जायचे. आता कदाचित आधुनिक काळात होत नाही. सध्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होत असतात,  सतत वादविवाद, भांडणे, मतभेदामुळे काही जोडपी आपल्या जोडीदाराऐवजी इतर ठिकाणी प्रेम शोधतात. हा चित्रपट लग्नानंतरच्या वैवाहिक जीवनातील आनंदावर भाष्य करतो आणि तेही चौकटीतच. 


चित्रपटाची  कथा काय?


विद्या बालन आणि प्रतीक गांधी हे पती-पत्नी असून, दोघांनीही कुटुंबाविरुद्ध प्रेमविवाह केला. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण  त्यांच्यात भांडण होत नाही. एका अर्थाने हे योग्य वाटत असले तरी भांडणामुळे प्रेम जिवंत राहते, असे चित्रपटात विद्या बालन सांगते. कदाचित एका अर्थाने खरं असू शकते. या दोघांचेही विवाहबाह्य संबंध आहेत. विद्या ही  एक हँण्डसन फोटोग्राफर सेंधिल राममूर्तीच्या प्रेमात आहे, तर प्रतीक रंगभूमीवरील अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या प्रेमात आहे. 


इलियान देखील प्रतीकच्या मुलाची आई होते. विद्या आणि प्रतीक दोघांनाही  आपलं वैवाहिक नाते संपुष्टात आणायचे आहे. परंतु ते एकमेकांना सांगू शकत नाहीत. याच दरम्यान, एका नातेवाईकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या अंत्यसंस्काराला जावे लागते. त्या वेळी काही गोष्टी घडतात. आता, त्या मृत नातेवाईकावरील अंत्यसंस्कारासोबत या दोघांच्या वैवाहिक आयुष्याचाही शेवट होणार का, की दोघेही आपलं वैवाहिक नातं जपण्याचा प्रयत्न करणार?


चित्रपट कसा आहे?


या चित्रपटात कोणताही मोठा स्टार हिरो नाही. पण विद्या असताना मग मोठ्या स्टार हिरोची काय गरज आहे? पण हा चित्रपट चांगला आहे. हा चित्रपट नात्यांमधील सत्यता दाखवतो ज्याशी तुम्ही स्वत:ला जोडून पाहू शकता.चित्रपटात कोणतेही बोजड संवाद नाहीत. आपल्यासोबतही अथवा आपल्या आजूबाजूलाही असं घडतं असं तुम्हाला वाटतं. कदाचित हा चित्रपट पाहून तुम्हाला पती-पत्नीचे नाते काही वर्षांनी कसे बनते हे समजू शकेल आणि जर तुमच्या लग्नाला काही वर्षे उलटून गेली असतील तर तुम्ही देखील या चित्रपटाशी स्वत:ला रिलेट करू शकता. 


या चित्रपटात वडील आणि मुलीचे नातेही सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. हा असा चित्रपट नाही जिथे नायक 20 गुंडांना मारतो, हिरोच्या तोंडी टाळ्या पिटणारे डायलॉग्स आहेत. पण, या चित्रपटातील व्यक्तीरेखा संवाद साधतात, ते तुमच्या मनाला भिडते.  सेंथिलची तुटक हिंदी ही तुमच्या चेहऱ्यावर हसू आणते. विद्याच्या अभिनयावर तुम्ही फिदा होऊ शकता. प्रतीक गांधीचा अभिनय तर सुंदरच आहे. 



कलाकारांचा अभिनय कसा आहे


विद्या बालन चित्रपटाची नायक आहे. पत्नी, मुलगी आणि प्रेयसी या तिन्ही भूमिका तिने अतिशय आत्मीयतेने साकारली आहे. विद्या ही अप्रतिम अभिनेत्री आहे, हे तुम्हाला दिसून येईल. प्रतीक गांधींने देखील विद्या बालन सारख्या कसलेल्या अभिनेत्रीसमोर आपल्या अभिनयाचे नाणं खणखणीत वाजवलं आहे. सेंथिलचा अभिनयही चांगला असून त्याच्या हिंदीच्या प्रेमात तुम्ही पडू शकता. इलियानानेदेखील सुंदर काम केले आहे. तिच्या वाटेला आणखी काही सीन्स आले असते तर तिने त्याचे सोनं केलं असते.


दिग्दर्शन कसे आहे?


शीर्षा गुहा ठाकुरता यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. दिग्दर्शन उत्तम आहे. नातेसंबंधावर चित्रपट करताना  दिग्दर्शकाला चांगली समज आहे, असे दिसून येते. विद्या बालन सारख्या अभिनेत्रीचा चित्रपटात हुशारीने वापर केला. या चित्रपटामुळे विद्याकडून आणखी अपेक्षा वाढतात.  एकूणच हा चित्रपट चांगला असून काही विवाहित जोडप्यांना या चित्रपटाची कथा त्यांच्या जवळ वाटू शकते.