मुंबई : आतुरता आगमनाची... सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) 19 सप्टेंबरला मंगळवारी आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदू धर्मानुसार, या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असंही म्हटलं जातं. या दिवशी लाडक्या गणरायाची मूर्ती जयघोषात घरी आणतात आणि त्याची स्थापना करुन मनोभावे पूजा केली जाते. गणेशभक्त फक्त भारतातच नाहीतर तर जगभरात आहे. भारतासह जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि त्याची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या विसर्जनाने होते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाल्याचं शास्त्रात सांगितलं जातं. गणपतीच्या जन्म कसा झाला तुम्हाला माहित आहे का? श्री गणेशाच्या जन्मामागे एक अतिशय रंजक कथा आहे. ही कहाणी वाचा सविस्तर...


गणेशाच्या जन्माची रंजक कथा


श्री गणेश माता पार्वतीचा पुत्र आहे. गणपतीच्या जन्मामागे अतिशय रंजक कथा आहे. शिवपुराणातील कथेनुसार, एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळदी आणि उटणे लावलं होते. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकला, अशाप्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने अंघोळीला जाताना दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्रीगणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले. पण  गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं.


यानंतर जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दु:ख झालं. यावेळी माता पार्वतीने महादेवाला यामागचं कारण विचारलं. यानंतर माता पार्वतीने गणपतीचं शीर कापण्यामागचं कारण विचारलं आणि आपल्या मुलाचे शीर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. यावेळी सर्व देवता तेथे जमा झाले. यानंतर भगवान शंकर आणि भगवान विष्णूच्या आदेशानंतर गरुड देवाने उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शीर आणण्यासाठी निघाले. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर त्यांना एक हत्ती सापडला आणि त्यांनी हत्तीचं शीर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. 


पण, यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती. कारण, गणपतीचं शरीर मानवी आणि शीर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्रीगणेशाची पूजा केली आजे. तसेच हत्तीच्या शीरामुळेच श्रगणेशाला गजमुख हे नाव पडलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ganesh Chaturthi 2023 : यंदा गणेश चतुर्थीला अद्भुत योग, 'या' राशीच्या लोकांना होणार धनलाभ