पंढरपूर : मानला तर देव नाही तर दगड या उक्ती प्रमाणे देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेमध्ये आहे.  म्हणूनच अष्ट कलातील एक कला म्हणून शिल्पकलेची ओळख आहे. अतिशय प्राचीन काळापासून विठुरायाच्या या नगरीत ही कला जोपासली जातेय आणि म्हणूनच वर्षभर येथे बनविलेल्या शेकडो आकर्षक दगडी मुर्त्या देशभर आणि अगदी सातासमुद्रापार जात असतात. आषाढी महासोहळ्यासाठी मागणीनुसार दगडी मुर्त्या बनविण्यासाठी कारागीर सध्या रात्रंदिवस झटत आहेत.  यात्राकाळात या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने यंदा आषाढीसाठी  मोठ्या प्रमाणात या मुर्त्या बनवून ठेवण्यात आल्या आहेत. विठुराया आणि विविध संतांच्या मुर्त्या हे पंढरपूरचे खास वैशिष्ट्य असते  म्हणूनच वाड्या वस्त्यापासून मोठमोठ्या शहरातील मंदिरात पंढरपुरात  बनलेल्या दगडी मुर्त्या विराजमान झालेल्या दिसतात . 


ओभड धोभड दगडातून आकर्षक ,रेखीव प्रसन्न भावमुद्रा तयार करण्याची कला म्हणजे ही शिल्पकला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणूनच दगडातून साकारणाऱ्या परब्रह्म रुपाला देवपण येते जे जगभर पूजनीय ठरते. विठुरायाच्या पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल करणारा व्यवसाय म्हणजे मूर्तीकला. आषाढी आणि इतर यात्रा काळात देशभरातून येणारे भाविक विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांच्या मुर्त्या येथून घेऊन जाऊन आपापल्या गावात त्याची मंदिरात आणि घरात प्रतिष्ठापना करतात. आधीच्या यात्रेला येऊन आपल्याला हव्या त्या आकाराची मूर्ती तयार करायला सांगून पुढच्या यात्रेत ती घेऊन जायची वारकरी संप्रदायात प्रथा आहे


मुर्त्या बनविण्याचे काम बाराही महिने सुरू


गाव तिथे विठुराया ही परिस्थिती महाराष्ट्र , कर्नाटक , तामिळनाडू , तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पाहायला मिळते . विठुरायाचे लाखो भक्त आपल्या गावातील मंदिरात विठुरायाची स्थापना करून उपासना करत असतात.याचबरोबर महाराष्ट्रात बऱ्याच गावात संत ज्ञानेश्वर , संत नामदेव , संत तुकाराम यांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळेच पंढरपूर परिसरातील 12 ते 15 कारखान्यात या दगडी मुर्त्या बनविण्याचे काम बाराही महिने सुरू असते. मात्र येथील परदेशी आणि मंडवाले हे दोन कारखाने पिढ्यानपिढ्या येथे दगडी मुर्त्या घडविण्याचे काम करत आहेत. पंढरपुरातील जुन्या कारखान्यांपैकी  मंडवाले   यांच्या कारखान्यात सध्या उच्च शिक्षण घेऊनही अक्षय हा सहाव्या पिढीचा तरुण मूर्तीकलेतच आपले करिअर करत आहे. 10 हजारापासून 5 लाखांपर्यंत विविध आकारात या दगडी मुर्त्या बनविल्या जात असतात.


बिहार आणि नेपाळमधून दगड मागवला जातो


यासाठी विशिष्ठ प्रकारच्या दगडांची वापर करण्यात येत असतो . बहुतांश मुर्त्या या गंडकी पाषाण अर्थात शाळीग्राम दगड  , कृष्णशीला, काळा पाषाण अशा प्रकारच्या दगडांच्या पासून विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या मुर्त्या बनविल्या जातात . मात्र अलीकडच्या काळात संतांच्या मुर्त्या या संगमरवरी दगडात बनविण्याची प्रथा सुरू झाली आहे. यासाठी लागणार काळा पाषाण हा नेवासा आणि सोलापूर जिल्ह्यात मिळतो तर  गंडकी पाषाण हा बिहार आणि नेपाळ सीमेवरील गंडकी नदीतून मिळतो त्यामुळे येथून हा दगड मागविला जातो. तर कृष्णशीला हा दगड कर्नाटक मधील बागलकोट येथून आणण्यात येतो. तर इतर देवतांच्या मुर्त्यांसाठी  संगमरवर दगड हा  राजस्थान येथून मागवले जातात . 


विठुरायाच्या मूर्तीसाठी काळा किंवा गंडकी पाषाणाचा वापर 


मुर्त्यांच्या आकारावरून त्याचे दर ठरले जातात. मुख्यतः विठुरायाची मूर्ती ही काळा किंवा गंडकी पाषाणातच बनविली जाते. कोणतीही मूर्ती बनविताना प्रथम दगडावर स्केचिंग करून मगच कामाला सुरुवात होते. सुरुवातीला मूर्तीचा सांगाडा बनवून मग त्याला रेखीव आकार दिले जातात. एकदा मूर्ती तयार झाली की त्यावर फिनिशिंग साठी खूप कष्ट घ्यावे लागतात . या मुर्त्यांना ग्रॅण्डरने मूळ दगड कट करून पॉलिश पेपरच्या साहाय्याने घासून सुबकपणा आणि अचूकता साधली जाते. मुर्त्यांच्या आकारावर त्याच्या किंमती ठरतात .


आषाढी यात्रा काळात 50 ते 60 लाखांची उलाढाल 


 एक कारागीर दगडी मूर्ती बनविण्यासाठी 15 दिवस कष्ट करतो .  पंढरपूर येथील कारखान्यातून दरवर्षी अनेक मुर्त्या अमेरिका आणि युरोपला जात असतात. यंदाही आषाढी यात्रेसाठी मागण्यानुसार शेकडो मुर्त्या सध्या बनवून तयार झाल्या असून भाविकांच्या खरेदीसाठी सज्ज झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे तीन फुटापेक्षा मोठ्या दगडी मुर्त्या  55 हजार रुपयाला मिळतात. आषाढी काळात मंदावले यांनी मोठ्या 50 ते 60 मुर्त्या बनविल्या असून लहान 150 मुर्त्या तयार केल्या आहेत . अशाच पद्धतीने शहरातील इतर कारखान्यातही मोठ्या संख्येने दगडी मुर्त्या तयार झाल्या आहेत. आषाढी यात्रा काळात दगडी मुर्त्यांची जवळपास 50 ते 60 लाखांची उलाढाल होत असते .