अवयव प्रत्यारोपण झालेले किंवा अवयव निकामी असणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळविण्यासाठी विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. चेन्नई येथील एका संस्थेने नेमकी या व्यक्तींची अडचण लक्षात घेऊन त्यांना नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने या करीता सर्व अवयव प्रत्यारोपण झालेले किंवा अवयव निकामी असणाऱ्या आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला असून त्या व्यक्तींकडून ते ऑनलाईन अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अवयव निकामी आणि प्रत्यारोपीतांच्या उपजीविकेचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होणार आहे.


चेन्नई येथे मोहन फाऊन्डेशन या बिगर सरकारी संस्थेचे मुख्य कार्यालय असून देशभरात 9 शाखा आहेत. या संस्थेने याकामासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी याकरिता देशभरात एक मोहीम उभारली आहे. यासंदर्भातील सर्व माहिती triomph.org.in या संकेतस्थळ भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता. देशभरात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव निकामी असणाऱ्या अनेक जणांना जगण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे. संपूर्ण देशभरात अवयव दानासंदर्भात मोठी जनजागृती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचा अवयवदान प्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. नागरिक अवयवदान करण्यासाठी स्वतःहून पुढे येत असल्याचे चित्र महाराष्ट्र राज्यात पाहावयास मिळत आहे.


याप्रकरणी या मोहिमेच्या प्रमुख जया जयराम यांनी सांगितले कि, "आम्ही अशी काही उदाहरणे पाहिली आहे कि काही व्यक्तींना अवयव निकामी झाल्यामुळे नोकरी सोडावी लागली आहे किंवा ज्यांचे प्रत्यारोपण झाले आहे, त्यांना नोकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे आम्ही काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या एचआर विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा करीत आहोत, त्यांच्याकडे अवयव निकामी झालेल्या किंवा अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीच्या नोकरीबाबत काही निश्चित धोरण आहे का? किंवा अशा व्यक्तींना नोकरीवर ठेवण्यात त्यांना स्वारस्य आहे का? अशी माहिती गोळा करीत आहोत.


त्याप्रमाणे अवयव निकामी झालेल्या किंवा अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीकडून त्यांना नोकरीची गरज आहे का? असेल तर त्यांचा बायोडाटा घेतला जाणार असून ज्या कंपन्यांना गरज असेल त्याप्रमाणे संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे काही व्यक्तींनी जिवंतपणी किडनी किंवा यकृताचा भाग दान केलेला असतो अशा व्यक्तींचा सुद्धा या सर्वेक्षणात समावेश असणार आहे. अशा पद्धतीची वेळ कोणावरही येऊ शकते. सध्या तरी ही सुरुवात आहे आता पुढे जाऊन कशा पद्धतीने प्रतिसाद येतो ते पाहावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिक या tiromph.psg@gmail.com या ई-मेल वर संपर्क करू शकता.


BLOG | अवयवदान चळवळीला कोरोनाचा व्हायरस !


राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, सध्या राज्यात अवयवांची गरज असणारी रुग्णाची प्रतीक्षायादी खूप मोठी आहे. मूत्रपिंडासाठी 5514, यकृतासाठी 1097, हृदयासाठी 74 आणि फुफ्फुसासाठी 16 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. यापैकी किडनीसाठी प्रतीक्षेत असणारे रुग्ण डायलेसीसवर आणखी काही महिने जगू शकतात. मात्र, हृदय, यकृत आणि फुफ्फुस यासारखे अवयव असणाऱ्या रुग्णाची परिस्थिती ही बिकट असते. कारण त्यांना अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.


तसेच या गोष्टीची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने या काळात प्रत्यारोपण करण्यासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जर एखादा रुग्ण इतका गंभीर आहे की जर त्याच्यावर अवयव प्रत्यारोपण नाही केले तर तो सहा महिन्यात दगावण्याची शक्यता 50 टक्क्यापेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांना प्रत्यारोपणाचा फायदा मिळाला पाहिजे. तसेच किडनी मिळण्यासाठी जे अतिगंभीर रुग्ण आहेत, त्यांना 'अधिक प्राधन्य देण्यात यावे' अशा वर्गात त्यांचा समावेश करावा. तसेच जर मेंदूमृत अवयवदानामार्फत किडनी हा अवयव मिळाला असेल आणि प्राधान्याने लागणाऱ्या वर्गवारीत किडनी घेणारा रुग्ण नसेल तर ती किडनी प्रतीक्षायादी प्रमाणे प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णास देण्यात यावी, यामुळे मिळालेला अवयव वाया जाणार नाही.


मेंदूमृत अवयवदान म्हणजे जीवनदान. गेल्या काही वर्षात अवयवदान मोहिमेने महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला होता त्याकरिता गेल्यावर्षीच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलातर्फे अवयवदानामध्ये महाराष्ट्र राज्याला ‘उत्कृष्ट राज्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2019 साली सुमारे 160 मेंदूमृत अवयवदान पार पडले होते, त्यामुळे 445 पेक्षा अधिक रुग्णांना नवीन जीवन मिळाले होते. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. राज्याचे देशपातळीवर कौतुक करण्यात आले होते. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता जास्त असतानाच नेमका या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अख्या देशात झाला आणि या सामाजिक मोहिमेला एक प्रकारची खीळ बसली. मेंदूमृत अवयवदानामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळण्यास मदत होत असते. मार्च ते जुलै या महिन्यात केवळ 22 अवयदान राज्यात पार पडले होते, गेल्यावर्षीच्या तुलनेनं हा आकडा खूपच कमी आहे.


BLOG | हाताचे प्रत्यारोपण, नवीन उमेद


2020 सालात, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत त्यामधून 86 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले होते. त्यानंतर कोरोनाचा काळ सुरु झाला. त्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत त्यामधून 21 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहेत. यावरून या काळात मेंदूमृत अवयवदान किती झाले आहेत याची प्रचिती येते. ही माहिती राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेकडून प्राप्त झाली आहे, राज्यातील अवयवदान आणि त्या संदर्भातील सर्व गोष्टीवर देखरेख ठेवणारी म्हणून संस्था काम करत असते. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे, लॉकडाउनच्या या काळात 18 जुलैला एका मेंदूमृत 39 वर्षीय महिलेने हृदय, यकृत, दोन मूत्रपिंडे दान केलीत. त्यामुळे कोरोनकाळातील हे पहिले हृदय दान ठरले आहे. ही शस्त्रक्रिया नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पार पडली.


आपल्याकडे राज्यात अवयवांच्या नियमनाकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा चार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती कार्यरत आहेत. या समिती मार्फत ज्या रुग्णांना अवयव पाहिजे आहे त्यांचे नोंदणीकरण केले जाते. ही समिती मेंदूमृत व्यक्तीचे अवयव आणि गरजू रुग्णांमध्ये समन्वयाचे काम पाहत असते. गेल्या काही वर्षात या समित्या उत्तमरीत्या आपले काम करीत आहेत. तसेच काही रूग्णांच्या बाबतीत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाची परवानगी आवश्यक असते, ती प्रकरणे त्यांच्या समंतीने पुढे जातात. या व्यतिरिक्त आपल्या राज्यात काही वर्षांपूर्वीच अवयव दाना संदर्भात राज्यस्तरावर समन्वय साधणारी, अवयदान आणि त्या संदर्भातील कामावर देखरेख करणारी राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलतर्फे स्थापना करण्यात आली आहे.