Important days in 23st April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 23 एप्रिलचे दिनविशेष.  



1995 : जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला 


जागतिक पुस्तक दिन हा दिवस प्रथम 23 एप्रिल 1923 मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर 1995 मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला. 


1635 : अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूलची स्थापना  
अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा  बोस्टन लॅटिन या शाळेची स्थापना बोस्टन शहरात 23 एप्रिल 1635 रोजी झाली.  या शाळेचा प्रथम वर्ग मास्टर फिलेमॉन पोर्मोर्ट यांच्या घरी  भरवण्यात आला होता. जॉन हल हा या शाळेतून पदवीधर झालेला पहिला विद्यार्थी होता. 


1818 : इंग्रज अधिकारी मेजर हॉल यांनी कर्नल प्रॉयर याला रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले  


रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.  याच किल्ल्याची टेहळणी करण्यासाठी दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने 23 एप्रिल 1818 रोजी पाठविले.


1990 नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश 
 नामिबिया हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. या देशाची पश्चिम सीमा अटलांटिक महासागर आहे. तर याच्या उत्तरेला झांबिया आणि अंगोला, पूर्वेला बोत्सवाना आणि दक्षिण आणि पूर्वेला दक्षिण आफ्रिका या देशांच्या सीमा आहेत. नामिबियाच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर 21 मार्च 1990 रोजी नामिबियाला दक्षिण आफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले. नामिबिया हे संयुक्त राष्ट्र (UN), दक्षिण आफ्रिकन विकास समुदाय, आफ्रिकन युनियन आणि राष्ट्रकुल यांचे सदस्य राष्ट्र आहे. स्वातंत्र्यांनंतर 23 एप्रिल 1990 रोजी नामिबियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला. 



1616 : इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा मृत्यू  


विल्यम शेक्सपिअर हे इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार होते. त्यांनी लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपिअरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. त्यांचा प्रभाव मराठी साहित्यिकांवर असलेले आपल्याला पाहायला मिळतो. जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. त्यांना "फादर ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 1616 रोजी झाला. 


 1857 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म 
मॅक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लॅंक यांजा जन्म  23 एप्रिल 1857 मध्ये झाला. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला. या शोधातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यामधील क्रांतीला सुरुवात झाली.


1873 : समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म
 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जामखंडी येथे 23 एप्रिल 1873 मध्ये झाला. एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचे काम 1910 सालापर्यंत केले. एकेश्वरी धर्म परिषद भरविण्यात पुढाकार घेतला व सुबोधपत्रिका साप्ताहिकात त्यांनी अनेक लेख लिहिले. 1905 मध्ये महर्षि विठ्ठल शिंदे अहमदनगर जवळ असलेल्या भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित म्हणून गेले होते. त्यानंतर 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी मुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही संस्था स्थापन केली. महर्षि विठ्ठल शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा, वसतिगृहे उघडणे, अस्पृश्यांच्या वस्थित शिकवण कामाचे वर्ग चालविणे, त्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे आजारी माणसांचे शुश्रूषा करणे इत्यादी गोष्टींचा त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमात समावेश होतो.  


1938 : शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म
एस. जानकी यांनी तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये 20 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1938 रोजी झाला.  


1977 : भारतीय-अनेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म
काल पेन यांचा जन्म 23 एप्रिल 1977 मध्ये झाला. एक अभिनेता म्हणून ते दूरचित्रवाणी कार्यक्रम हाऊसमध्ये लॉरेन्स कुटनरची भूमिका करण्यासाठी तसेच हॅरोल्ड आणि कुमार चित्रपट मालिकेत कुमार पटेलची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 'द नेमसेक' या चित्रपटातील अभिनयासाठीही त्यांना ओळखले जाते. 


1957 : शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन 


 निष्ठावंत समर्थभक्त, रामदासी संप्रदाय व साहित्याचे संशोधक, अभ्यासक, प्रकाशक व सामाजिक, राजकीय कार्येकर्ते म्हणून  शंकर श्रीकृष्ण यांना ओळखले जाते. धुळे येथे त्यांचा जन्म झाला.  1893 मध्ये धुळ्यात त्यांनी ‘सत्कार्योत्तेजक सभे’ची स्थापना केली. मराठ्यांच्या इतिहासाचे आणि जुन्या मराठी साहित्याचे विशेषतः रामदासी साहित्याचे संशोधन आणि प्रकाशन करणे, हे या संस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. या संस्थेच्या ‘रामदास आणि रामदासी’ या ग्रंथमालेने समर्थांचे दासबोधादी ग्रंथ तसेच रामदासी संशोधनपर लेखनही प्रकाशित केले. 


1968 : पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन


भारतीय शास्त्रीय संगीतातील पटियाला घराण्याचे गायक म्हणून बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांना ओळखले जाते. भारतातील महान गायक आणि संगीतकारांमध्ये त्यांची गणना होते. त्यांचा जन्म पाकिस्तानात लाहोरजवळील कसूर नावाच्या ठिकाणी झाला. परंतु, त्यांनी आपले जीवन लाहोर, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद येथे व्यतीत केले. प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली हे त्यांचे शिष्य होते. त्यांचे कुटुंब संगीतकारांचे कुटुंब होते. बडे गुलाम अली खान यांचे संगीत जगत एक सारंगी वादक म्हणून सुरू झाले, नंतर त्यांनी त्यांचे वडील अली बक्श खान, काका काले खान आणि बाबा शिंदे खान यांच्याकडून ते संगीत शिकले.


1986 : इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन 
कसोटीमध्ये एका डावात दहा बळी मिळविण्याचा पराक्रम जिम लेकर यांनी सर्वप्रथम केला. जुलै 1956 ला ऑस्ट्रेलियाविरुध्द अशेस सिरिजमधे ओल्ड ट्रैफर्डवर जिम यांनी हा विक्रम केला होता. महत्वाचे म्हणजे त्या कसोटीत जिमने ऑस्ट्रेलियाच्या 20 पैकी 19 विकेट्स एकट्या जिम यांनीच घेतल्या होत्या. इतर गोलंदाजांनी तब्बल 123 षटके टाकली. परंतु, ते एकच गडी ते बाद करु शकले. लेकर यांनी पहिल्या डावात 37 धावांत नऊ तर, दुसऱ्या डावात 53 धावांत सर्वच्या सर्व दहा गडी बाद केले होते. हा सामना “लेकर्स मॅच” म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर जिम बर्क हा एकमेव खेळाडू होता ज्याला त्या सामन्यात लेकर बाद करू शकला नव्हते. त्यामुळे जिम बर्क यांचेही नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचे लिहिले गेले. त्यांचे निधन 23 एप्रिल 1986 रोजी झाले.


1992 : ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन


ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न सत्यजित रे यांचे 23 एप्रिल 1992 रोजी निधन झाले. 'पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता.


2001 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव ठिळक यांचे निधन


जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते होते. गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आणि केसरीचे संपादक म्हणूनही जयंतराव टिळक यांनी काम केले होते. त्यांचा जन्म 12 आक्टोबर 1921 रोजी झाला. तर मृत्यू 23 एप्रिल 2001 रोजी झाला. 


1858 : समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म
पंडिता रमाबाईंना देशातील पहिल्या स्त्रीवादी म्हटले जाते. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी महाराष्ट्रातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे संस्कृत पंडित होते. त्यांनी रमाबाईंना संस्कृत शिकवले. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे, या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईं यांना त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या 15-16 वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले. 1877 साली दुष्काळात रमाबाईंचे आई-वडील वारले. रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविले होतेच, पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. त्याचबरोबर त्यांना गुजराती, तुळू व हिब्रू या भाषाही अवगत होत्या. 1878 साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 



2000 : 40 वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन 


मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन 40 वर्षे लालबागमधील 'भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन 23 एप्रिल 2000 रोजी झाले. 


नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे 14 वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म 23 एप्रिल 1897 रोजी झाला.