Important Days in June 2022 : अवघ्या पाच दिवसांवर जून महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जून महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? चला जाणून घेऊयात. 


1 जून : जागतिक दूध दिन (World Milk Day)


जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक दूध दिन' साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 


3 जून : संत मुक्ताई पालखी सोहळा 


दोन वर्ष कोरोना संकटामुळे आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळयात खंड पडला होता. मात्र, यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्यावर पुन्हा एकदा वारकऱ्यांना पालखी सोहळ्यासोबत पंढरीची वाट चालायचे वेध लागले आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनला प्रस्थान होणार आहे. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजे समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होणार आहे. 




5 जून : जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day)


जागतिक पर्यावरण दिन हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.    


6 जून : श्री. गजानन महाराज पालखी सोहळा


या वर्षीच्या आषाढीनिमित्त होणाऱ्या पंढरपूर यात्रेसाठी शेगाव येथील श्री. गजानन महाराजांची पालखी 6 जूनला प्रस्थान करणार आहे. कोरोना काळामुळे मागील दोन वर्ष पालखी सोहळा रद्द झाला होता. माक्ष, यंदा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वारीचे यंदाचे हे 53 वे वर्ष आहे. 




6 जून : शिवराज्याभिषेक दिन.


छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमी गडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात. शिवराज्याभिषेक दिन हा 6 जूनला सुरु होतो. आणि शिवराज्याभिषेक सोहळा हा सहा दिवस चालला. 12 जूनला तो पूर्ण झाला. 




7 जून : जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day) 


7 जून 2019 रोजी प्रथमच जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. हे संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर 2018 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते. हा दिवस अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जनजागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणारा मृत्युदर कमी करणे हे या दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. 


10 जून : निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi) 


दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यात जलपूजन करणे महत्वाचे आहे कारण या महिन्यात सूर्यदेवाची तेज तीव्र असते त्यामुळे उष्णता अधिक वाढते. निर्जला एकादशी व्रताला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीच्या व्रताचे पुण्य सर्व तीर्थयात्रा आणि दानापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. 



12 जून : बालकामगार विरोधी दिन (Anti-Child Labor Day) 


जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे. हा बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) 12 जून 2002 रोजी केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. 


13 जून : महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार


येत्या 31 मे रोजी राज्यातील मुंबई वगळता इतर 13 महापालिकांच्या आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं सुरु केली आहे. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे रोजी होणार आहे. तर आरक्षण 13 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेची आरक्षणाची सोडत नंतर जाहीर होणार आहे.



13 जून : संत निवृत्तीनाथ पालखी


दोन वर्षांच्या खंडानंतर आता संत निवृत्तीनाथ पालखी (Sant Nivruttinath Palkhi) यंदा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे. यासाठी संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे वेळापत्रक ठरले असून 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 




14 जून : जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)


रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना (WHO) 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात येतो. 


14 जून : वटपौर्णिमा


हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. 




14 जून : कबीर जयंती  


कबीर दास हे भक्ती काळाचे एकमेव कवी आहेत ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समाज सुधारणेच्या कार्यात व्यतीत केले. कबीर हे कर्मभिमुख कवी होते. समाज आणि समाजाच्या कल्याणासाठी कबीर यांचे संपूर्ण जीवन उल्लेखनीय आहे. कबीर हे मार्मिक कवी असण्याबरोबरच उदारमतवादी समाजसुधारकही होते. एक प्रकारे, सार्थक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना त्यांनी बजावली असं म्हणता येईल.


15 जून : जागतिक पवन दिवस (Global wind day)


पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.


15 जून : मिथुन संक्रांती (Mithun Sankranti)


हिंदू पंचांगानुसार, वृषभ राशीतील प्रवास पूर्ण करून सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो. या राशी बदलाला मिथुन संक्रांत म्हणतात. अशा एका वर्षात बारा संक्रांती असतात. सूर्य हे शिस्तीचे प्रतीक आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याची विशेष पूजा केली जाते.




17 जून : संकष्ट चतुर्थी


17 जून 2022 रोजी ज्येष्ठ वद्य चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थी दिनी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते. गणेश भक्तांसाठी संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असते. या दिवशी चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. त्यानंतर वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेशभक्त उपवास सोडतात.


17 जून : गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी 


गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.




18 जून : झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी. 


राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. 1857 च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.


19 जून : जागतिक पितृदिन (World Father’s Day) 


'फादर्स डे' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1909 मध्ये सुरु झालेल्या 'मदर्स डे' पासून मिळाली. भारतातही हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात. 


20 जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा


अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थांनने या सोहळ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.  शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडतोय. यंदा हा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 


21 जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा


कोरोनामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या (Ashadhi Wari) सोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोना आवाक्यात आला आहे. म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. वारकरी ही तशा तयारीत आहेत. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 



21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) 


आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार 21 जूनला हा दिवस साजरा केला जातो. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.


24 जून : योगिनी एकादशी (Yogini Ekadashi)


ज्येष्ठ महिन्यातील वद्य त्रयोदशी योगिनी एकादशी नावाने साजरी केली जाते. यावर्षी 24 जून 2022 रोजी योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. योगिनी एकादशीचे व्रत आचरल्याने सर्व प्रकारच्या पापांतून मानवाला मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्णाने या व्रताचे महत्त्व विषद केले आहे. योगिनी एकादशीचे व्रताचे आचरण केल्यास 88 हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.


26 जून : छत्रपती शाहू महाराज जयंती.


शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू आणि चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी 18 मार्च 1884 रोजी त्यांना दत्तक घेतले आणि ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.


29 जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिवस (National Statistics Day)


राष्ट्रीय सांख्यिकी दिवस दरवर्षी 29 जून रोजी भारतात साजरा केला जातो. देशाचे महान सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांची जयंती 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' म्हणून साजरी केली जाते. आर्थिक नियोजन आणि सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल देशाच्या विधान परिषदेने प्रशांत चंद्र महालनोबिस यांची जयंती राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरी करण्याचा ठराव मंजूर केला. भारत सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो.


30 जून : महाकवी कालिदास जयंती


आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन (Kalidas Din) म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 30 जून रोजी साजरी केली जाणर आहे. आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो. त्यामुळे हा दिवस 'महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृत कवी आणि रचनाकार, नाटककार होते. 'उपमा' या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या :