मुंबई : अनेकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव असतो, त्यांच्या मित्रांची, फॉलोअर्सची यादी मोठी असते. असं असलं तरी त्यापैकी अनेकजण अडचणीच्या काळात स्वतःला एकटे पडल्याचं अनुभवतात. न्यूज कॉर्पच्या 'ग्रोथ डिस्टिलरी' आणि मेडिबँकच्या नव्या अभ्यासात हे भयावह वास्तव समोर आलं आहे. त्यामुळेडिजिटल गर्दीमागे लपलेलं एकटेपण समोर आलं आहे.
फक्त 2 मित्रांचा फरक, पण परिणाम मोठा
या अभ्यासानुसार, ज्या लोकांची मानसिक स्थिती चांगली आहे त्यांच्याकडे सरासरी पाच किंवा त्याहून जास्त मित्र असल्याचं समोर आलं आहे. पण जे पण जे मानसिकदृष्ट्या संघर्ष करत आहेत, त्यांच्याकडे फक्त तीनच मित्र असतात. ही लहानशी वाटणारी दोन मित्रांची तफावत मोठा परिणाम करणारी ठरते. त्यामुळे 'मी परिस्थिती हाताळू शकतो' या भावनेपासून 'कोणाला त्रास नको म्हणून मी शांत राहतो' या अवस्थेत माणूस पोहोचतो.
सोबत असूनही दूर का वाटतं?
आजची सोशल लाइफ जरी बिझी असली, तरी ती वरवरची आहे. अनेक जण इव्हेंटला जातात, ग्रुप चॅटमध्ये सक्रिय असतात, त्यांचे शेकडो मित्र असतात. पण एखादं संकट आलं की अशा व्यक्ती कुणालाही फोन करणं टाळतात.
थोडं बिझी आहोत असं सांगितलं जातं
अशा वेळी आपण हक्काने आपली समस्या सांगू शकू असे मित्र आपल्याकडे नसतात. आपली समस्या सांगून आपण इतरांवर ओझं होऊ नये, किंवा त्यांना आपण दुर्बल असल्याचं दिसू नये म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो. अशा तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला कुणी काही विचारलंच तर 'फक्त थोडे थकलोय' किंवा 'फार बिझी आहोत' असं सांगून आपण वेळ मारून नेतो. प्रत्यक्षात आपण खूप थकलेलो असतो.
खरं नातं काय असतं?
रिपोर्टमध्ये म्हटलंय की, खरं नातं म्हणजे 50 किंवा 100 मित्र असणे नव्हे, तर एखादा असा व्यक्ती जो निःसंकोचपणे तुमचा फोन उचलेल, तुमच्या मदतीला येईल. त्याचप्रमाणे तुम्हीही त्याच्यासाठी कधीही, वेळ न पाहता मदतीसाठी पोहोचाल.
पाचच मित्र पुरेसे आहेत
सतत ऑनलाईन असूनही आपण कुणाला कॉल करणार आहोत? किंवा सोशल मीडियावर शेकडो मित्र असूनही वेळ देऊन भेटायला येणारे, बोलणारे किती जण असतात? शेवटी तुमच्यावर संकट आलं किंवा तुम्ही अडचणीत सापडला तर तुम्ही हक्काने कुणाला फोन कराल?
या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या आयुष्यात शेकडो नव्हे तर फक्त पाच सच्चे मित्र असणे पुरेसे आहेत. ते मित्र तुमच्या अडीअडचणीला धावून येतील आणि तुम्हीही त्यांच्यासाठी धावून जाल.
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे,
- मानसिक आधार देण्यासाठी ना थेरपिस्ट गरजेचा आहे ना विशेष प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती. त्यासाठी पुरेसा असतो तो फक्त एक सच्चा मित्र.
- पाच विश्वासू मित्र एवढंच पुरेसं आहे. असं या रिपोर्टमध्ये ठामपणे म्हटलं आहे. ही संख्या लहान वाटली तरी ती मुलभूत आहे.
- एक प्रामाणिक, भावनिक संवादही भावनिक सुरक्षिततेची पायाभरणी करू शकतो.
- वरवरच्या नात्यांपलिकडे जाऊन संवाद साधा आणि इतरांशीच नाही तर स्वतःशीही प्रामाणिक राहा.
- डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाती जुळवताना, हा अहवाल आठवण करून देतो की, खरी मैत्री इमोजी किंवा मीम्समध्ये नाही, तर कठीण प्रसंगी मिळणाऱ्या साथीत असते.
- जगात प्रत्येकजण एकमेकांच्या संपर्कात असतो, पण संकट आलंच तर, तुम्ही कोणाला फोन कराल? त्यावर खरं आणि विश्वासाचं नातं टिकून असतं.