Health Problem Due To Ac: उन्हाळा सुरू झाला असून उष्णतेनं प्रत्येकजण हैराण आहे. उन्हाच्या झळांनी अगदी नकोसं केलं आहे. सध्या उन्हाळ्यात AC ही प्रत्येकाचीच गरज बनली आहे. अनेकांना AC ची इतकी सवय होते की, एसी सुरू केल्याशिवाय झोपच येत नाही. एवढंच नाहीतर अनेकांना एसीची इतकी सवय होते की, AC शिवाय ते राहूच शकत नाही. त्यांना 24 तास एसीची गरज लागते. 


तुम्हीही एसीमध्ये 24 तास राहता का? तुम्हालाही एसीची सवय झाली आहे का? तर लगेच सावध व्हा आणि आधी सविस्तर जाणून घ्या. एसीची सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. तुमच्या आरोग्यावरही या सवयीचे दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच, तुम्हाला गंभीर आजारही जडू शकतात. यासोबतच तुम्हाला त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. 


AC ची सवय महागात पडेल, लवकर दूर करा; जाणून घ्या दुष्परिणाम 


1.बऱ्याच लोकांना रात्रभर AC चालू करून झोपायची सवय असते. रात्रभर 16 ते 18 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाशिवाय त्यांना गाढ झोप लागतच नाही. यामुळे शरीरातील तापमानाचं संतुलन बिघडून आजारी पडू शकता. जसे की, वारंवार सर्दी-खोकला होणं, अंग दुखणं इत्यादी. 
2. एअर कंडिशन चालू केल्यामुळे घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद कराव्या लागतात. त्यामुळे घरात फ्रेश हवा येत नाही. घरात मोकळी हवा खेळती राहिली नाही, तर तुम्हाला थकवा आल्यासारखं जाणवू लागतं.
3. तुम्हाला 24 तास एअर कंडिशनमध्ये झोपायची सवय असेल, तर त्वचेचे आजार होऊ शकतात. एअर कंडिशनच्या खोलीत हवेतील आद्रता शोषूण घेतली जाते. यामुळे तुमच्या स्किनमधील ओलसरपणा नाहीसा होऊन त्वचा कोरडी पडते. तुम्ही जर सातत्याने एअर कंडिशनच्या संपर्कात राहत असाल, तर तुमची त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
4. एसीमध्ये जास्तकाळ झोपल्यामुळे तुमचा श्वास कोंडल्यासारखा होईल. यामुळे श्वसनाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागू शकतो.
5. एअर कंडिशनमध्ये जास्तकाळ राहिल्यामुळे लठ्ठपणाची समस्या होऊ शकते. तुमची शरीराची हालचान न झाल्यामुळे शरीरातील फॅट्सचं प्रमाण वाढतं आणि लठ्ठपणाला बळी पडू शकता.
6. तुम्ही एसीच्या खोलीत जास्तवेळ राहिल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते. यामुळे संसर्गजन्य रोगांची लागण लवकर होते आणि डोके दुखीचाही त्रास होऊ शकतो.
7. एसीच्या खोलीत जास्तवेळ झोपल्यामुळे अंगदुखी होऊ शकते. यामुळे मान, पाठ आणि कंबरेत त्रास जाणवू लागतो.
8. तुम्ही एसीच्या खोलीत राहात असाल, तर तुम्हाला तहान कमी लागते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि तुम्ही डिहायड्रेशला बळी पडू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)