पुणे : अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (Avascular Necrosis) म्हणजेच ऑस्टिओ नेक्रोसिस. यामध्ये हिप्सच्या जॉईंटना रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत पावतात. तरुणांमध्ये मद्यपानाचे वाढते प्रमाण हे एक चिंतेचे कारण ठरत आहे. ज्याचे दीर्घकालीन परिणाम चिंताजनक आहेत. अति मद्यपानाच्या सवयींमुळे 60% तरुणांना उतारवयात अव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN) चा धोका असतो. मद्यपान हे 50 वर्षे आणि त्यावरील वयाच्या प्रौढांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे प्रमुख कारण ठरत असून त्यांना प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते.
किंबहुना जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ जमा होऊ शकतात. हे हाडांमधील रक्त प्रवाह अवरोधित करतात, परिणामी अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो. पुण्यातील जहांगिर मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
25 ते 35 वयोगटातील 60% तरुणांना अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होण्याची शक्यता
दरम्यान, या विषयी अधिक माहिती देताना डॉ. आशिष अरबट म्हणाले की, महिनाभरात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांपैकी अति मद्यपान करणाऱ्या 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे 10 पैकी 5 व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसची समस्या आढळून येते. अशा रुग्णांना हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. प्रौढांमध्ये एव्हीएनच्या प्रकरणांमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 25 ते 35 वयोगटातील 60% तरुणांना अति मद्यपानामुळे त्यांच्या वयाच्या पन्नाशीतच अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होण्याची शक्यता वाढते.
अतिमद्यपान हे नितंबाच्या अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे एक प्रमुख कारण ठरते आहे. अव्हॅस्कुलर नेक्रोसिस ही अशी स्थिती आहे जिथे रक्तपुरवठ्याअभावी हाडांच्या ऊती मरतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि हाडे ठिसूळ होतात, तूटतात. मद्यपान आणि स्टिरॉइडचा वापर हा 65% पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिससारख्या समस्येस कारणीभूत ठरतो. अल्कोहोलच्या सेवनाने अव्हॅस्कुलर नेक्रोसिस झालेले बहुतेक रुग्ण सहसा 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील असतात. साधारणपणे 8 ते 10 वर्षे सलग अल्कोहोलचे सेवन करत असल्यास आठवड्यातून ४०० मिली किंवा त्याहून अधिक मद्य आपल्या शरीरात जाते.
मद्यपानामुळे सीरम ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्टेरॉलची पातळी तसेच अस्थिमज्जामध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचा धोका इतर घटकांवर देखील अवलंबून असतो,जसे की तंबाखूचा वापर, जुनाट आजार आणि अनुवांशिकता. मद्यपानामुळे ऑस्टिओनेक्रोसिसचा धोका वाढते. याची लक्षणे म्हणजे कंबरदुखी, स्नायुंमधील कडकपणा आणि स्नायुंच्या हलचालींवर येणाऱ्या मर्यादा. या रुग्णाप्रमाणेच, नितंबाचे हाड मोडलेल्या रुग्णांवर टोटल हिप रिप्लेसमेंटने उपचार केले जातात.
याविषयी अधिक बोलताना पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजन कोठारी म्हणाले की, तरुणांमध्ये हिपच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कारण अनेकांना अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे (AVN) निदान होत आहे. त्यामागची कारणे म्हणजे स्टिरॉइड्सचा गैरवापर, हाड मोडणे, नितंबाचे हाड मोडणे, रेडिएशन थेरपी, अति मद्यपान अशी आहेत. अल्कोहोलचे सेवन आणि अव्हॅस्कुलर नेक्रोसिस यांच्यात परस्परसंबंध आहे. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन हा अव्हॅस्कुलर नेक्रोसिससाठी एक जोखीम घटक आहे, कारण तो हाडांमधील रक्त प्रवाह बिघडवतो, ज्यामुळे हाडांमधील पेशींचा मृत्यू होतो. त्याच्या लक्षणांमध्ये सांधेदुखी आणि स्नायुंचा कडकपणा यांचा समावेश आहे.
दरमहा, अंदाजे, 25 ते 35 आणि त्याहून अधिक वयोगटातील 10 पैकी 3 लोकांना अति मद्यपानामुळे अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो. जास्त मद्यपान केल्यामुळे जीवनमान सुधारण्यासाठी हिप रिप्लेसमेंटची आवश्यकता असलेल्या प्रौढांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसच्या प्रकरणांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 23 ते 30 वयोगटातील सुमारे 45% तरुणांना भविष्यात अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचा धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास, अव्हॅस्कुलर नेक्रोसिसमुळे सांध्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हिप रिप्लेसमेंट प्रक्रियेची आवश्यकता भासते.
अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे हाडांच्या ऊती मृत पावण्याचा धोका
डॉ. अरबट पुढे सांगतात की, रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, गतिशीलता आणि शारीरीक हालचालींमध्ये सुधारणा आणण्यासाठी हिप रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय आहे. जेव्हा शारीरिक उपचार, वेदनाशामक औषधे किंवा चालताना आधार घेण्यासारख्या उपचारांमुळे आराम मिळत नाही तेव्हा शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. सध्या, सुपरपॅथ हिप रिप्लेसमेंट ही अव्हॅस्कुलर नेक्रोसिसशी झुंजणाऱ्यांसाठी एक प्रभावी तंत्र ठरत आहे. हे एक कमीत कमी आक्रमक टोटल हिप रिप्लेसमेंट तंत्र आहे ज्यामध्ये एक लहान छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जाते, यामध्ये चीरफाड न केल्याने जवळचे स्नायू किंवा स्नायुबंधाचे नुकसान होत नाही.
यामुळे बरे होण्याचा कालावधी आणि रुग्णालयातून घरी जाण्याचा कालावधी कमी होतो, कमीत कमी रक्तस्त्राव होतो आणि यशस्वी परिणाम मिळतात. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही त्रासाशिवाय किंवा नितंबाच्या वेदनेशिवाय चालू शकतात. रुग्ण कोणत्याही आव्हानांशिवाय त्यांच्या दैनंदिन कामांना पुन्हा सुरूवात करू शकतो.
हे ही वाचा