Health: भारतात दृष्टी अधू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. डोळ्यांचा संसर्ग, कॉर्नियाचे अंधत्व वाढत आहे. देशात दरवर्षी याच्याशी संबंधित अंदाजे 20,000 ते 25,000 नवीन रुग्ण आढळतात. देशात दृष्टी अधू होण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. देशात एकूण अंधत्व सुमारे 7.5% आहे. कॉर्नियाविषयक अंधत्वाची कारणं सांगायची झाली तर, अलिकडच्या वर्षांत केराटायटिस सारख्या संसर्गजन्य रोगांमुळे डोळ्यांच्या आजारांत बदल होत चालले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात डोळ्यांच्या देखभालीवर मर्यादा येते, तेथे दृष्टीसंबंधी समस्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मुंबई येथील डॉ. अगरवाल्ज आय हॉस्पिटलचे कॅटरॅक्ट सर्जन डॉ. स्मित बावेरिया यांनी सध्या सुरू असलेल्या अंधत्व जागृती महिन्यात याच्याशी संबंधित माहिती दिली. 


ग्रामीण किंवा दुर्गम भागात प्रमाण अधिक


केराटायटिस मध्ये सामान्यतः डोळ्यात सौम्य जळजळ, लालसरपणा किंवा दृष्टीदोषापासून, कॉर्नियावर गंभीर व्रण किंवा अपारदर्शकता अशा लक्षणात वाढ होत जाते. यावर उपचार न केल्यास आंशिक किंवा संपूर्ण दृष्टी नष्ट होते. विशेषतः ज्यांना संसर्ग झाला आहे किंवा किरकोळ दुखापत झाली आहे ज्यांनी अद्याप कॉर्नियाचा गंभीर परिणाम नाही अशा रूग्णांमध्ये उपचार सर्वात प्रभावी आहे. वेळेवर उपचार न झाल्यास, अनेक रुग्णांना, विशेषतः ग्रामीण किंवा दुर्गम भागात, बरा न होणाऱ्या अंधत्वाचा सामना करावा लागतो. या स्थितीबद्दल बोलताना, चेन्नईतील डॉ. अग्रवाल्स आय बॅंकच्या डॉ. प्रीती नवीन म्हणाल्या, "कॉर्नियलसंबंधी अंधत्व हे भारतात दृष्टी गमावण्याला जबाबदार असे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यामुळे सुमारे 12 लाख लोक ग्रस्त आहेत. 


कॉर्नियाविषयक अंधत्वाचे कारण काय?


भारतातील कॉर्नियाविषयक अंधत्वाचे अधिक प्रमाण प्रामुख्याने ट्रॅकोमा आणि केराटायटिस सारख्या संसर्गांमुळे, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील हानिकारक केमिकल्सचा वापर, डोळ्यांच्या दुखापतीमुळे, अ जीवनसत्त्वाच्या व्यापक कमतरतेमुळे आहे. स्वच्छतेचा अभाव, दुर्लक्ष करणे, विशेषतः ग्रामीण भागात आरोग्यसेवेची मर्यादित उपलब्धता यामुळे ही समस्या आणखी वाढते. ग्रामीण भागातील मुले आणि प्रौढ व्यक्ती विशेषतः दृष्टी गमावून बसतात. डीजनरेटिव्ह आय स्थितीमुळे वृद्ध व्यक्तींनाही धोका असतो. एकंदरीत, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे 1 ते 2% लोकांना कॉर्नियल अंधत्व होण्याचा धोका आहे. 


निदान कसे होते? नेत्रतज्ज्ञ सांगतात..


“भारतातील कॉर्नियासंबंधी अंधत्वाच्या सध्याच्या निदान पद्धतींमध्ये डोळ्यांची सर्वसमावेशक तपासणी, दृश्य तीक्ष्णता चाचणी आणि स्लिट-लॅम्प बायोमाइक्रोस्कोपी यांचा समावेश आहे. ज्यामुळे नेत्ररोगतज्ज्ञांना या आजाराच्या स्पष्टतेचे मूल्यांकन करता येते. केराटायटिस, अल्सर किंवा व्रण यासारख्या परिस्थिती ओळखता येतात. अँटीरियर सेगमेंट ऑप्टिकल कोहेरेन्स टोमोग्राफी (एएसओसीटी) आणि कॉर्नियल टोपोग्राफी यासारखी प्रगत इमेजिंग तंत्रे कॉर्नियाची जाडी आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाच्या अनियमिततेचे तपशीलवार मूल्यांकन उपलब्ध करून देतात. ज्यामुळे अचूक निदान करण्यास मदत होते. मधुमेह किंवा गंभीर रोगप्रतिकारक विकारांपायी दृष्टी पूर्ववत होणे कठीण बनते. मात्र इतर व्यक्तींमध्ये कॉर्नियल प्रत्यारोपण किंवा उपचारात्मक हस्तक्षेप देखील अत्यंत यशस्वी आहेत", असे डॉ. प्रीती नवीन पुढे म्हणाल्या.


वैद्यकीय मदतीचा अभाव


बंगळुरू येथील डॉ. अगरवाल्ज आय हॉस्पिटल येथील कॉर्निया आणि रिफ्रेक्टीव्ह आय सर्जन डॉ. संजना वत्स म्हणाल्या, ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना दर्जेदार डोळ्यांची देखभाल मिळू शकत नाही. ज्यामुळे वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्यांच्या कॉर्नियाचा उपचार अशक्य बनतो. त्याशिवाय आरोग्य देखभाल देणाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच स्रोत यामध्ये लक्षणीय तूट असल्याने कॉर्नियाचे व्यवस्थापन आणि उपचार प्रभावीपणे करणे हाताबाहेर गेलेले असते. अशात कॉर्निया दात्यांचा अभाव हा देखील एक मुख्य अडथळा आहे. कारण कॉर्निया प्रत्यारोपणाचे काही कार्यक्रम घेतले जातात. मात्र दृष्टीदान आणि कॉर्निया प्रत्यारोपण प्रचाराचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. आजच्या घडीला जवळपास 2 लाख प्रत्यारोपण आवश्यक असताना वर्षाला केवळ 25 ते 30 हजार कॉर्निया दान होताना दिसते. गरीबी आणि कुपोषण यांसारखे सामाजिक-आर्थिक घटक कॉर्नियासंबंधी अंधत्वाचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे प्रतिबंध आणि उपचार राबविणे कठीण होते.   


बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक


“भारतातील कॉर्नियाशी निगडीत अंधत्वाच्या घटना कमी करण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. वैयक्तिक स्तरावर, डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढवण्याची गरज आहे. प्रारंभिक अवस्थेत समस्या ओळखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी नियमित नेत्र तपासणीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नेत्र आरोग्य शिक्षण आणि कॉर्निया दानाचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम सुरू केल्याने लोकसहभाग वाढू शकतो. पोषण कमतरता दूर करण्यासाठी कार्यक्रम राबविणे, विशेषत: असुरक्षित लोकांमध्ये जीवनसत्व 'अ' पूरक आहार हे कॉर्नियाशी संबंधित समस्या कमी करू शकतात,” असे डॉ. वत्स पुढे बोलताना म्हणाल्या. 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )