मुंबईः राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर आहे. कोरोनाचं संकट डोक्यावर असताना असा बिनमोसमी पाऊस आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा डॉक्टर्स करत आहेत. त्यामुळं या पावसात आरोग्याची काळजी घेणं  गरजेचं आहे. वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा आणि अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहून देणे यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. या पावसामुळं होणारे आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.

  
सध्या महत्वाचं म्हणजे कोरोनाचं सावट आहे. त्यात नवीन व्हेरियंटचा धसका सर्वांनी घेतला आहे. त्यामुळं या पावसानं आजारी न पडण्याची काळजी आपण घ्यायची आहे. डॉक्टरांनी देखील वातावरणातील बदल हा धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं आहे. डॉ. अमोल कांबळे सांगतात की, वातावरणातील बदल भारतासह सर्व जगासाठी खूप मोठ्या धोक्याची घंटा आहे. निसर्गाला जपलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. अन्यथा विनाश अटळ आहे, असं डॉ. कांबळे सांगतात. 


नेमकी काय काळजी घ्यावी...


हिवताप, मलेरियाः पावसाळ्यात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते.
 
सर्दी, खोकलाः अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.
 
दमाः ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.
 
जुलाबः पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते.
 
पायाला चिखल्या होणेः पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.
 
उपाययोजना आणि प्रतिबंध
पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलणं गरजेचं आहे.
 
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे. घरात किंवा परिसरात स्वच्छता ठेवणे. तसेच डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे.
 
स्वच्छ किंवा उष्ण पाणी पिणे
 
पावसात भिजणे टाळावे
 
आजाराची लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे
 


आहार विषयक काळजी
पावसाळ्यात पचन न होणारा आहार घेतल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फुड, उपवासासाठी शेंगदाणे किंवा भगर हे पदार्थ खाणे टाळावे.
 
पचायला हलके आणि उष्ण पदार्थ शक्यतो घ्यावे. यामध्ये बेसन लाडू, टोमॅटो सुप, वांगी, भेंडवळ, कैरी, लिंबु, चिंच, सुखे खोबरे या पदार्थांचा वापर करावा.