Health Benefits of Millet : सध्या माणसाच्या आरोग्याबाबतच्या (Health) तक्रारी वाढताना दिसत आहेत. स्थूलता, लठ्ठपणा, उच्च- रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळं होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, अनुवांशिक नसलेले कर्करोग अशा आजारांचं प्रमाण वाढत आहे. मात्र, या सर्व समस्येवर आपल्या भारतातील पारंपरिक तृणधान्य-भरडधान्याच्या (Millet) उपयोगाद्वारे उपाय शोधता येईल. तृणधान्य-भरडधान्याचे आरोग्यात किती महत्व आहे, याबाबतची माहिती वैद्यकीय व्यावसायिक आणि पौष्टिक अन्नधान्य विषयातील अभ्यासक डॉ.अर्चना ठोंबरे (Dr. Archana Thombare) यांनी दिली आहे. 


मोठे तृणधान्य म्हणजे ज्वारी आणि बाजरी आणि  छोटे तृणधान्य म्हणजे नाचणी, भगर, राळ, कोद्रो, सावा, वरी, छोटा सावा. छोट्या तृणधान्यांना विविध भागात नागली, मोर, भादली, कांगणी असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पूर्वी ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके खळ्यात मळणे या प्रक्रियेने तयार केली जात असत. पण छोट्या तृणधान्याचे वरील आवरण, टणक असल्यामुळं भरडावे किंवा कांडावे लागत असे आणि म्हणून यांना भरडधान्ये म्हटली जातात. काळाच्या ओघात शेतात हे पीक कमी घेतले जावू लागले. तसेच भरडणे आणि कांडणे ही प्रक्रिया किचकट असल्यामुळं माणसांच्या आहारातून अशी ही मूल्यवान तृणधान्य नाहीशी झाली. समाजात आहार आणि आरोग्याविषयी जागरुकता आल्यानं भरडधान्य आता ताटात दिसू लागले आहे. भारताच्या प्रयत्नाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणूनही साजरे केले जात असल्याने  आणि त्यासाठी जनजागृतीचे विवध उपक्रम आयोजित केले जात असल्याने नागरिकांना भरडधान्याचे महत्व कळले आहे. 


साखर नियंत्रित रहात असल्यानं या तृणधान्यांना जगभरात मागणी


तांदळामध्ये असणारा 0.2 ग्रॅम प्रति ग्रॅम तंतू आणि भगरमध्ये असणारा 10.01 ग्रॅम प्रती 100 ग्रॅम तंतू ही तुलना लक्षात घेतल्यास भरडधान्याचे महत्व लक्षात येते. आहारतंतू हे वजन नियंत्रित करणे, लठ्ठपणा कमी करणे, पोट साफ ठेवणे, पित्ताशयात खडे न होऊ देणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, यासाठी उपयुक्त असतात. तंतू हे इन्शूलिनचा प्रतिसाद वाढवण्याचे कार्य करतात. त्यामुळं साखर नियंत्रित रहात असल्यानं या धान्यांना जगभरात मागणी  आहे. लहान मुली मुलांपासून ते पौगडावस्था, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यामध्ये लोहाची कमतरता असते. लहान मुलांमध्ये मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त असे लोह आहारात समाविष्ट असणे जरुरी आहे. बाजरीतील 8 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम, राळमधील 6.3 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम लोह आणि तुलनेत तांदळातील 1 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम असणाऱ्या लोहाचे प्रमाण लक्षात घेतल्यास आहारात भरडधान्याची उपयुक्तता लक्षात येत असल्याचे अर्चना ठोंबरे यांनी सांगितले. 


नाचणीमध्ये असणारं कॉल्शिअम हाडांच्या वाढीसाठी


शरीराच्या प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी लागणारे कॉल्शिअम तसेच हाडांच्या वाढीसाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी लागणारे कॉल्शिअम हे नाचणीमध्ये 344-364 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम आहे. नाचणी आहारातून बाजूल सारल्यानं कॅल्शिअमच्या पूर्ततेसाठी औषधे घ्यावी लागतात. डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले केरोटिन बाजरीमध्ये असते. तृणधान्य- भरडधान्य मध्ये असणारी साखर ही जटील कर्बोदके स्वरुपाची असल्यानं रक्तात विरघळण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळं मधुमेहग्रस्त व्यक्तिमध्ये साखर नियंत्रित करण्यात आणि  वजन कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. या धान्यांमध्ये असणारे ॲन्टिऑक्सिडंट  पेशींना इजा होऊ देत नाही. तसेच कर्करोग प्रतिबंधूसाठी ॲन्टिऑक्सिडंटचे कार्य उपयुक्त असते. तृणधान्य- भरडधान्य यामध्ये असणारे 7 ते 12 टक्के प्रथिन हे स्नायू बळकटीकरण आणि शरीराच्या प्रक्रियामध्ये उपयुक्त असते.


भरडधान्य खाताना सहा तास भिजवून ठेवणे आवश्यक


जीवनसत्व, सूक्ष्मपोषकद्रव्ये युक्त असल्यामुळं शरीरातील पेशींची वाढ आणि कार्य व्यवस्थित राहते. तसेच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. मानसिक आरोग्य चांगले राहणे, झोप शांत लागणे यासाठी उपयुक्त आहेत. भरडधान्य खाताना त्यांना अगोदर कमीतकमी सहा तास भिजवून ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या तंतूत पाण्याचे शोषण होणे शरीरासाठी उपयुक्त आहे. याच्यापासून पोळी-भाकरी, ठोसा, इडली, आप्पे, विविध प्रकारच भात, खिचडी, बिस्कीट , ब्रेड, पिझा बेस आपण बनवू शकतो.


पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृतीसाठी शासनाचा पुढाकार


शासनाच्या कृषी विभागाने पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. विविध स्तरावर या धान्याचे महत्व समजावले जात आहे. एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त् असलेले हे धान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारे आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्तानं आणि आपल्या आरोग्यासाठीदेखील आपण आहारात तृणधान्य-भरडधान्याचा समावेश करुया.


महत्त्वाच्या बातम्या:


Mann Ki Baat Highlights : ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, मन की बातमधून पंतप्रधानांनी सांगितलं तृणधान्याचं महत्त्व