Conjunctivitis in Mumbai : मुंबईत मागील दोन आठवड्यांपासून नेत्र संसर्गाचे (डोळे येणे) (conjunctivitis) रुग्ण वाढत आहेत. महानगरपालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील 15 दिवसांत सुमारे 250 ते 300 नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि त्रास जाणवल्यास तातडीने नेत्र तज्ञांकडून सल्ला आणि औषधोपचार घ्यावेत, असं आवाहन मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केलं आहे.


मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी वर्षा रोकडे यांनी नेत्र संसर्गाच्या लक्षणाची माहिती देताना सांगितलं की, "पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढला की वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक ठरते. त्यामुळे दरवर्षी या दिवसात इतर आजारांबरोबर नेत्र संसर्ग अर्थात डोळे येण्याची साथ पसरते. नेत्र संसर्गाच्या साथीमध्ये सुरुवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो, त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला देखील संसर्ग होतो. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते आणि सतत डोळ्यांमधून पाणी देखील येते. डोळे लाल होतात. सुरुवातीला ही लक्षणे एका डोळ्यास जाणवतात आणि त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला देखील जाणवतात. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेरील बाजूस येत असतो. तसेच डोळ्यांना आतील बाजूस सूज येते. डोळ्यांना खाज येते. डोळे जड वाटतात आणि तीव्र प्रकाश सहन होत नाही. या प्रकारच्या संसर्गामुळे काही लोकांना ताप देखील येतो. सध्या या साथीचे कारण विषाणूजन्य आहे, असे आढळून येत आहे.


दरम्यान, नेत्र संसर्गबाधित रुग्ण आढळून लागल्याने मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईतील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. नेत्र संसर्ग प्राथमिक लक्षणे जाणवू लागतात तातडीने उपचार करुन घ्यावेत, असं आवाहन पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?


- डोळे आले असतील अशा वेळी डोळ्यांना सतत हात लावू नये. 
- तसेच डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धुत राहावे. 
- डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करु नये. 
- कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे/सुरक्षित अंतर राखून राहावे. 
- तसेच कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ञांचा/नेत्र उपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानेच उपचार आणि औषधे घ्यावीत. 
- योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर 5 ते 6 दिवसांत डोळे बरे होतात. 
- एकदा डोळे येऊन गेले की, परत त्या व्यक्तीला संसर्ग होत नाही, असे नाही. 
- एकदा नेत्र संसर्ग होऊन बरे होऊनही पुन्हा त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा करणे योग्य नाही. 
- मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य निदान आणि उपचार पुरवले जातात. 


संबंधित बातमी


मुंबईकरांनो काळजी घ्या! शहरात पसरलीय डोळ्यांची साथ, संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?