Prashant Damle Gela Madhav Kunikade:   ‘अरे हाय काय अन् नाय काय'... असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आता रंगभूमीवर कमबॅक करत आहे. गेला माधव कुणीकडे असा प्रश्न विचारणाऱ्या नाट्यरसिकांना आता याचे उत्तर मिळाले आहे. रसिकांना हास्याची मेजवानी देणाऱ्या 'माधव'ने  मध्यंतरी रंगभूमीवरून ब्रेक घेतला होता. आता रंगभूमीवर प्रशांत दामले (Prashant Damle) यांचे नाटक पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहे.  या नाटकाचा शेवटचा प्रयोग 2005 मध्ये झाला होता. त्यानंतर आता 19 वर्षांनी या नाटकाचे पुन्हा एकदा रंगभूमीवर कमबॅक होत आहे.  या नाटकाचे फक्त 63 प्रयोग रंगणार आहेत. 


'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या 'गेला माधव कुणीकडे' या  खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर नाट्यरसिकांनी दाद दिली. या नाटकातील प्रशांत दामले यांचा  'अरे हाय काय अन् नाय काय'  हा  डायलॉग आजही चांगलाच प्रसिद्ध आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. 7 डिसेंबर 1992 रोजी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर 1802 प्रयोग झाले. 


प्रयोग कधीपासून रंगणार?


मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने 'ब्रेक' घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ 15  जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी 4 वाजता होणार आहे. नाटकाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ 1 जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’अॅप वर सुरू होणार आहे. 


प्रशांत दामले यांनी काय म्हटले?


रसिकांना हसवण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावत रंगभूमी हीच कर्मभूमी मानत एकापेक्षा एक सरस नाटकं देणाऱ्या प्रशांत दामले यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणत रसिकांना मनोरंजनाची अफलातून ट्रीट दिली आहे. काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक त्यापैकीच एक असून मायबाप रसिकांसाठी' हे  नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचे अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले.  


दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी या नाटकात आहे. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदी  कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकात प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.