मुंबई : बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) सीझन सुरुवातीपासूनच चर्चेत होता, याचं कारण म्हणजे त्यातील सदस्य यूट्यूबर (YouTuber) अरमान मलिक (Armaan Malik) आणि त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका (Kritika Malik) आणि पायल (Payal Malik). अरमान मलिक दोन्ही पत्नींसोबत या शोमध्ये सहभागी झाला होता. पायल मलिक  लवकर बिग बॉसच्या घराबाहेर पडली. अरमानही काही दिवसांनी एलिमिनेट झाला, पण कृतिका मलिकचा प्रवास अंतिम फेरीच्या दिवशी संपला. कृतिका मलिक या शोच्या पहिल्या पाच फायनलिस्टपैकी एक होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर कृतिका एका मुलाखतीदरम्यान तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल मोकळेपणाने बोलली आहे.


 "दुसरी बायको" टॅगवर कृतिका मलिकची प्रतिक्रिया


'बिग बॉस OTT 3' मध्ये असताना कृतिका मलिकवर अनेक आरोप करण्यात आले होते. मीडियाचे प्रतिनिधी 'बिग बॉस'च्या घरात पोहोचले तेव्हा कृतिकाला अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. त्यादरम्यान कृतिकाला डायन, दुसरी बायको आणि घर तोडणारी असे टॅग मिळाले. त्या सर्व टॅगबद्दल बोलताना कृतिका म्हणाली, 'मला या सर्व नावांनी हाक मारली जाते. याचं मला फार वाईट वाटतं. याच कारणामुळे मी शोमध्ये रडलीही होती. मी पण एक माणूस आहे'.


"माझ्याकडे एकच पर्याय होता"


कृतिका पुढे म्हणाली, ज्या दिवशी मिडिया प्रतिनिधी 'बिग बॉस'च्या घरात आले होते, तेव्हा त्यांच्या प्रश्नांनंतर माझे मन दुखावलं गेलं होतं. तिथे तुम्हाला व्यक्त व्हायची संधी मिळत नाही म्हणून रडणे हा एकच पर्याय माझ्याकडे होता. मी जाणूनबुजून काही केले नाही. मी किंवा पायल किंवा अरमान लग्नाला प्रोत्साहन देत नाही.


कृतिकावर कहाणी रचल्याचा आरोप


'बिग बॉस'च्या कृतिका मलिकवर घरात रचलेली कहाणी सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत कृतिका म्हणाली की, 'आम्हाला आमचं सत्य माहीत आहे. एखाद्या परिस्थितीतून जाणाऱ्यालाच त्याबद्दल माहीत असतं. आम्ही कोणतीही कहाणी रचली नाही. आम्ही तिघेही एकेकाळी खूप दुःखी होतो. आम्ही वेगळे होण्याचाही प्रयत्न केला, पण आज आम्ही एकत्र आहोत आणि आनंदी आहोत, हे आमचं सत्य आहे.'