Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेतील कोळी आणि गोखले कुटुंबात मिहिर-मिहिकाच्या साखरपुड्याची लगबग दिसणार आहे. पण, मिहिर-मिहिकाच्या लग्नात सावनीचे विघ्न येणार आहे. आता सावनीमुळे मिहिरचा साखरपुडा मोडला जाणार का, सागर-मुक्ता परिस्थिती हाताळणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे. 


कोळी-गोखले कुटुंबात आनंदाचे वातावरण...


मिहिर आणि मिहिकाच्या साखरपुड्याची लगबग कोळी आणि गोखले कुटुंबात सुरू झाली आहे. गोखले कुटुंबाच्या घरात मिहिर-मिहिकाच्या लग्नाची बोलणी आणि साखरपुड्याची तयारी सुरू असते. घरात आनंदाचे वातावरण असते.


सई आणि सागरमध्ये प्रेमळ संवाद सुरू असतो. सई निरागसपणे सागरला लग्नानंतर मुली दुसरीकडे जाऊन का राहतात असा प्रश्न विचारते. त्यावर ही पद्धत असते असे सागर सांगतो. यावर सई मी लग्न करणार नसल्याचे सांगते, कारण मला तुमच्यापासून दूर जायचे नाही असे सांगते. सागरही तू माझा जीव असल्याचे सांगतो. तेवढ्यात मुक्ता येते आणि  सईची समजूत घालते.


माधवी-इंद्रामध्ये वादावादी


लग्नाच्या बोलणीच्या वेळी इंद्रा मिहिर-मिहिकाचे लग्न आमच्या पद्धतीने होईल असे सांगते. तर, माधवीदेखील लग्न आमच्या पद्धतीने होईल असे म्हणते. माधवी आणि इंद्रामध्ये थोडी वादावादी सुरू होते. माधवी ही मुक्ता-सागरच्या लग्नातील गोंधळ सांगते. तर, इंद्रा त्यावर माधवीला सुनावते. या वादावादीत  सागर-मुक्ता हे दोघेही मिहिर-मिहिकाला दुसऱ्या रुममध्ये आणतात. गप्पा मारत असतात.


मिहिर-मिहिकाच्या साखरपुड्यात सावनीचे विघ्न 


लग्नाच्या पद्धतीने वाद सुरू असताना तेवढ्यात सावनी येते. माधवी तिला तुमचं आमच्यामध्ये काय काम आहे असे विचारते. त्यावर सावनी मिहिर हा माझा भाऊ आहे असे सांगते. त्यामुळे त्याचे लग्न कसे होणार हे ठरवण्याचा माझा अधिकार असल्याचे सावनी सांगते. सावनीच्या या गौप्यस्फोटाने माधवी आणि पुरूला धक्का बसतो. मुक्तालाही या गौप्यस्फोटाने धक्का बसतो.


मिहिर सावनीला सुनावणार


सावनी तिथे मिहिरला जुन्या गोष्टी विसरून जा असे सांगते. डोळ्यात अश्रू आणून नाटक करते. यावर मिहिर तिला तू नाटक करू थांबव असे सांगतो. मला सागरने भावासारखा वागवले. इंद्रा मावशीने मुलासारखं प्रेम दिले असल्याचे सांगतो. एकतरी नाते तू जपलं नाहीस असे मिहिर ठणकावतो. तुझं आणि माझं काहीच संबंध नाही असे मिहिर सांगतो. त्यावर सावनी तुझं आणि माझं नाते आहे,  आपली आई, कुळ एकच आहे असे मिहिर ओरडून सांगतो. सावनी तिथून निघून जाते.