Madhuri Pawar:  अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीचा अक्षय याचं 12 दिवसांपूर्वी निधन झाले आहे. भावाच्या निधनानंतर माधुरीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. माधुरीनं या पोस्टच्या माध्यमातून भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच माधुरीनं या पोस्टमधून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


माधुरी पवारची पोस्ट


माधुरीनं इन्स्टाग्रमवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “प्रिय अक्षय, तुला जाऊन 12 दिवस झाले. हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, असं आपण बऱ्याचदा म्हणतो. खरंय उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखःद घटना घडण्यापासून थांबवू शकले असते. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की तू नाहीयेस ही कल्पनाच सहन होत नाहीये. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. मला तुझा खूप आधार वाटायचा. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरू करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी ‘नाही’ असं बोलला नाहीस. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही कामाला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतंस. कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास. कायम स्वतःपेक्षा बहिणींच्या कामाला प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल.”


“तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं, ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झालीच नाही. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्षे रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनाचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण दिवाळीतील भाऊबीज आठवून जास्त त्रास होतोय. एका सावलीसारखा तू सोबत असायचा. पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?” असंही माधुरीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.


माधुरीनं पोस्टमध्ये लिहिलं, "माझा नेहमी अट्टहास असायचा की अक्षय तुला जे काही पाहिजे ते जगाकडे मागण्याऐवजी माझ्याकडे माग. आजही तुला खूप काही द्यावंसं वाटतंय, तुझ्या इच्छा पूर्ण कराव्याश्या वाटत आहेत आणि मी ते नक्की करेन. मी नक्कीच गेल्या जन्मी पुण्य केलं असणार म्हणून या जन्मी मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला पण तुझ्यासोबत आयुष्य अजून जास्त जगायला नक्कीच आनंद झाला असता... जिथे कुठे असशील तिथे देखील सगळ्यांना हसत खेळत ठेवशील याची मला खात्री आहे. माझ्या करिअरमध्ये तुझा सर्वात जास्त मोलाचा वाटा होता, मला एका मोठ्या उंचीवर तुला पाहायचं होतं, तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्की अजून मेहनत घेईन आणि कामाची जोमाने सुरुवात करेन. तुझी साथ, तुझं प्रेम, तुझा पाठिंबा माझ्या पाठीशी तसाच कायम ठेव! पण तुझी उणीव माझ्या मनात आणि आयुष्यात कायम राहणार अक्षू."






वेडात मराठे वीर दौडले सात, लंडन मिसळ या चित्रपटांमधून माधुरी ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


संबंधित बातम्या:


Gautami Patil and Madhuri Pawar : गौतमी पाटील Vs माधुरी पवार... कोण आहे लयभारी?