Jahnavi Insult Paddy Kamble Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या  (Bigg Bos Marathi Season 5) घरात चौथ्या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी सत्याचा पंचनामा हा टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये वादावादी झाली. ग्रुप ए मध्येही आपआपसात वाद झाले. तर, दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) पु्न्हा घरातील इतर सदस्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Paddy Kamble) यांच्या अभिनयाबाबत आणि करिअरच्या मुद्यावर अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याने नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका केली आहे. 


बिग बॉस मराठीच्या घरात 'सत्याचा पंचनामा' या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअर अपमानास्पद वक्तव्य केले. आपल्या ग्रुपचा डाव समोरची टीम उधळून लावत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रुप ए मध्ये चलबिचल सुरू झाली होती. त्यातच त्यांच्यात खटकेही उडू लागले होते. टास्कच्या दरम्यानच्या वेळेत जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.” असे म्हटले. 


जान्हवीचा उद्धटपणा...


पॅडी कांबळेंच्या करिअरवर भाष्य केल्यानंतर आर्या जाधव ही गार्डन एरियामध्ये बसलेल्या जान्हवीला जाब विचारते. त्यावर जान्हवी ही मग्रूरपणे तिला “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही” असे म्हणते. “तू जेवढं काम केलं नाहीये…तेवढी त्यांनी अ‍ॅक्टिंग केलीये. त्यांचा एक स्टेटस आहे…त्यांनी खूप काम केलंय त्यामुळे उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नकोस. इथे तू आधीच घाण करतेय पण, कोणाच्या करिअरवर केलेलं भाष्य ऐकून घेणार नाही, असे आर्या जान्हवीला म्हणते. पण,  जान्हवी तिच्याकडे कुत्सितपणे पाहते आणि जा तुझ्या गँगला घेऊन ये असे म्हणते. 


जान्हवीने पुन्हा पातळी ओलांडली, नेटकरी संतापले...


वीकेंडला होणाऱ्या  'भाऊचा धक्का' कार्यक्रमात शोचा होस्ट रितेश देशमुखने याआधी  जान्हवी किल्लेकरला तिच्या वागण्याबाबत आणि इतरांना अपमानास्पद बोलण्याबाबत खडे बोल सुनावले होते. कोणीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका असं रितेशने स्पष्ट केले होते. त्यानंतरही जान्हवीने आता पुन्हा एकदा पॅडी कांबळे यांच्या करिअरवर भाष्य केले.


जान्हवीच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. जान्हवीला आता बिग बॉस घराबाहेर काढणार का, असा सवालही प्रेक्षकांनी विचारला आहे. एका युजरने म्हटले की, बिगबॉसची लाडकी आहे ती. तिला सर्व माफ आहे. काहीही बोला सर्व माफ आहे.. बिगबॉस फक्त टीम अ मुळे चालू आहे असे बिगबॉसचे मत आहे असे म्हटले. तर, जान्हवीला कित्येक वेळा समजून सुद्धा काही फरक नाही पडला. बिग बॉस चूक आणि बरोबर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. एवढे मोठे अभिनेते ह्याचं वारंवार अपमान होतोय तरी ह्यांना काहीच फरक पडत नाही. टीआरपीसाठी एखाद्याची लायकी काढणे हे चुकीचे असल्याचे आणखी एका युजरने म्हटले.  वर्षा मॅडम, पॅडी सर यांच्या कारकिर्दीवर भाष्य करणे खरच अशोभनीय आहे. प्रत्येक शनिवारी रविवारी रितेश सरांनी समजून सुध्दा निक्की आणि जान्हवी यांच्यात काही फरक पडलेला दिसत नाही असा मुद्दाही एकाने मांडला. 'बिग बॉस' तिला काढणार नाही कारण टीआरपीसाठी ती महत्त्वाची असल्याकडे एका नेटकऱ्याने लक्ष वेधले. 









दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात 'सत्याचा पंचनामा' या टास्क दरम्यान एकाही सदस्याला बीबी करन्सी कमावता आली नाही. त्यामुळे याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा बिग बॉसने दोन्ही टीमला दिला आहे. त्यामुळे बिग बॉस नेमकं काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.