मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिषेकशी लग्न व्हावं म्हणून अंकिताने आत्महत्येचं खोटं नाटक रचलं. अंकिताच्या या वागण्याचा अभिषेकसोबतच संपूर्ण कुटुंबाला संशय होताच आता अखेरीस अंकिताची पोलखोल होणार आहे. अंकिताने आत्महत्येचं हे खोटं नाट्य कसं रचलं? यात कोण कोण सामील होतं? हे सारं आता उघड होणार आहे. 


महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिताच्या या नाट्याविषयी अनिरुद्धला कल्पना आहे. अनिरुद्धला सर्व माहित असूनही त्याने या सर्व गोष्टींवर मौन धरलं हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात पुन्हा एकदा उलथापालथ होणार आहे.


अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु असतानाच देशमुख कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडतो. अभिषेक अनघाला अंगठी घालणार तेवढ्यात अंकिताचा कॉल येतो आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समजल्यावर अभिषेक तातडीने मुंबईला जातो. अंकितासोबत लग्न करुनच तो परततो. यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसतो. परंतु अभिषेकला मिळवण्यासाठी अंकिताने रचलेल्या आत्महत्येच्या खोट्या नाटकाचं सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. 


दुसरीकडे अरुंधती आणि अनिरुद्धचं नातं अतिशय नाजूक वळणावर असताना अनिरुद्धच्या अशा वागण्याने अरुंधती पुन्हा एकदा दुखावली गेली आहे. आतापर्यंत प्रत्येक संकटाचा देशमुख कुटुंबाने एकत्र येऊन धीराने सामना केला आहे. त्यामुळे अंकिताचं पितळ उघडं पडल्यावर देशमुख कुटुंब काय निर्णय घेणार याची उत्कंठा वाढली आहे. 


अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाही. आप्पांकडे त्याने तसं बोलूनही दाखवलं आहे. द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाही. अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे.