Nikhil Chavan : मालिका, चित्रपटातील वेधक आणि मुख्य भूमिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चार्मिंग चेहरा म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण (Nikhil Chavan). अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या निखिलचा नाटक, मालिका, चित्रपट, वेबी सिरीज असा वाढतच जाणारा अभिनयकौशल्याचा आलेख वाखाणण्याजोगा आहे. कुठल्याही कलाकाराचा प्रवास साधा सरळ सोपा असा कधीच नसतो. तसेच, आजवर निखिललासुद्धा अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. त्याची धडपड, शिकण्याची उर्मीच त्याला आज कामी आली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022’  सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल सिनेअभिनेता निखिल चव्हाण याला जाहीर करण्यात आला आहे.


छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळ्यानिमित्त शनिवारी (14 मे) पुरंदर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात युवराज शहाजीराजे संभाजीराजे भोसले ,खा. सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. रोहित पवार, आ.संजय जगताप, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते या पुरस्काराने निखिलला सन्मानित करण्यात आले.


‘या’ अभिनेत्यांनी पटकावलाय पुरस्कार


विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आजवर सिनेक्षेत्रात या पुरस्काराचे मानकरी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेते भरत जाधव, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनेते अशोक समर्थ हे ठरले होते. यंदा या मानकरांच्या यादीत अभिनेता निखिल चव्हाणने आपले स्थान पटकावले आहे.



खरंच भरून पावलो : निखिल चव्हाण


याबाबत बोलताना निखिल म्हणतो की, ‘अभिनयक्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीची याहून चांगली पोचपावती असूच शकत नाही, कारण “छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार 2022” या यंदाच्या राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी मी ठरलो, आणि हा पुरस्कार मला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर मिळाला आहे, आणि किल्ल्यावर पुरस्कार मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. कारण महाराजांचे किल्ले आपल्यासाठी आदरणीय आहेत असे मला वाटते. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटतेय ती म्हणजे, हा गडकिल्ला इंडियन डिफेन्सच्या हातात आहे, त्या गडकिल्ल्यावर हा पुरस्कार मला मिळाला ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. खरंच भरून पावलो. दिग्गज सिनेअभिनेते या पुरस्काराचे याआधी मानकरी ठरले आहेत. मी माझी बरोबरी अर्थात त्यांच्याबरोबर नाही करू शकत. मात्र, त्यांच्या बरोबरीने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी कायमच लक्षणीय असेल. माझे कुटुंब, माझे चाहते आणि सबंध जनतेचा मी कायम ऋणी राहीन. आज त्यांच्यामुळे मी इथे आहे, असे मला वाटते. या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचा आभारी आहे.’


हेही वाचा :