मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका 'चला हवा येऊ द्या' ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांचे फोटो एडिट करून त्यात चला हवा येऊ द्यामधील कलाकार भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचे फोटो महाराजांच्या रूपात दाखवण्यात आलेत. यावरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून कलाकारांवर टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी 'चला हवा येऊ द्या' मधील कलाकरांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी दिला आहे.


छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या एका दृश्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मालिकेचा एक भाग नुकताच प्रदर्शित झाला, त्यामध्ये एका दृश्यात महाराज सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ फोटो एडिट करून त्याला विनोदी अंगाने दाखवण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार, निर्माते आणि कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या झी मराठी वाहिनी विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सदर प्रकरणी कलाकारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.



'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी.अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.' असं संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुकपोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं आहे की, 'आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूर ला कलानगरी मध्ये रूपांतरित केले होते. सयाजीराव गायकवादांचे योगदान ही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.'


दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह नेटकऱ्यांनीही 'चला हवा येऊ द्या' मधील कलाकार आणि निर्मात्यांवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच अनेकांनी आपल्या पोस्टमधून कलाकारांना आणि निर्मात्यांना जाहीर माफी मागण्याचं आवाहन देखील केलं आहे.