Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi New Season) घरात दुसऱ्याच दिवशी वादावादीला सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आणि मॉडेल अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांच्या चुकीमुळे घरातल्या इतर सदस्यांना जमिनीवर झोपावं लागणार असल्याचे खापर फोडलं. त्यावरून बिग बॉसच्या घरात राडा झाला. या भांडणानंतर दोघींच्याही डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले. 


काय झालं नेमकं?


घरात निर्णय क्षमता नसलेले स्पर्धक म्हणून घरातील सदस्यांनी   सूरज चव्हाण, इरीना आणि धनंजयला नॉमिनेट केले होते. बिग बॉसने या तिघांना बिग बॉस करन्सीच्या मदतीने घरातील सदस्यांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सांगितले. त्यानुसार, या तिघांनी आवश्यक असणारे खाद्यपदार्थ, अन्नधान्य, तेल खरेदी केले. मात्र, बेड खरेदी केले नाही. त्यामुळे बिग बॉसने घरातील सदस्यांना झोपण्यासाठी, बसण्यासाठी मज्जाव केला.  जान्हवी किल्लेदारने घरात प्रवेश करण्यापूर्वी बिग बॉस करन्सीला नकार देत आठवडाभरासाठी बेडचा पर्याय घेतल्याने तिला बेडवर झोपण्यास परवानगी देण्यात आली. तर, इतर सदस्यांना आठवडाभर स्लिपिंग बॅग देण्यात आल्या. 


बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन करत  वर्षा आणि अभिजीत हे बेडवर बसले होते. तर, अरबाझ पटेलही बसला होता. मात्र, अचानकपणे आपण नियम मोडत असल्याची जाणीव त्याला झाली. घरातील सदस्यांनी नियम मोडल्याने सगळ्यांनाच त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. बिग बॉसने सदस्यांकडील 'बिग बॉस करन्सी' काढून घेतली. याच मुद्द्यावरुन वर्षा आणि निक्की यांच्यामध्ये अतिशय वाईट भांडण झाले.


निक्कीचे वक्तव्य वर्षा उसगांवकरांना खटकले...


निक्कीने वर्षा उसगांवकरांना 'तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती', असा सवाल केला. त्यांच्या कॅरेक्टरवरुन तिने आक्षेपार्ह विधान केले. 'तुम्ही तंगडी वर करून झोपला होता, तुमच्यामुळे सगळ्यांना शिक्षा मिळाली' असे निक्कीने म्हटले. निक्कीचे हे वक्तव्य वर्षा यांना खटकले आणि त्यांनी शांतपणे निक्कीला तिची चूक सांगण्याचा प्रयत्न केला.


या भांडणानंतर निक्की बेडरुममध्ये असताना घन:श्याम दरवडे तिला समजावत असतो. त्यावेळी तिला रडू कोसळते. निक्की त्यावेळीही वर्षा उसगांवकर यांच्यावर आरोप करत असते. त्यावेळी अंकिता आणि इतर काही सदस्य उपस्थित असतात. तर, दुसरीकडे निक्कीने आपल्या वयाचा मान न ठेवता अरे-तुरे केल्याने आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वर्षा उसगांवकर यादेखील दुखावल्या गेल्या. त्यांनाही रडू कोसळले.


आज, बुधवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या टास्कमध्ये निक्की-वर्षा यांच्यातील वाद चिघळणार का, हे पाहावं लागणार आहे. 


घरात गटबाजीला सुरुवात?


'बिग बॉस'च्या घरात दुसऱ्याच दिवशी गट तयार होण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून आले. वर्षा-निक्कीच्या वादात अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे हे एका बाजूला दिसून आले. तर, दुसरीकडे  पॅडी, अंकिता हे वर्षा यांच्या बाजूने असल्याचे दिसून आले.


योगिता चव्हाण, आर्या जाधव, जान्हवी किल्लेदार हे खेळात पुढील स्ट्रॅटेजीसाठी आपला गट तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी इरिकालाही आपल्यासोबत येण्यासाठी सांगितले.