मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहलीविरोधात मुलीचा विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी श्वेताच्या तक्रारीनंतर अभिनव कोहलीला पोलिसांनी अटक केली आहे. श्वेताच्या आरोपानुसार, "अभिनव कायमच दारुच्या नशेत असतो. त्याने 18 वर्षीय सावत्र मुलगी पलकचा शिवीगाळ करत तिला मारहाण केली.


अभिनवला रविवारी (11 ऑगस्ट) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास मुंबईतील समतानगर पोलिस स्टेशनमध्ये आणलं आणि श्वेता-पलकच्या उपस्थितीत त्याची चार तास चौकशी केली. यानंतर पोलिसांनी श्वेताच्या तक्रारीनंतर अभिनवविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिस पुढील तपास करत आहेत.

सावत्र मुलीचा विनयभंग
अभिनवने सावत्र मुलगी पलकला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. श्वेताच्या आरोपांनुसार अभिनव माझ्या आणि पलकसोबत नेहमी गैरवर्तणूक करायचा. इतकंच काय तर अभिनवने पलकला त्याच्या मोबाईलमध्ये एका मॉडेलचा अश्लील फोटोही दाखवला होता. मात्र पलकवर हात उचलल्याने पाणी डोक्यावरुन गेलं. त्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याशिवाय पर्याय नव्हता.

दुसऱ्यांदा कौटुंबिक हिंसाचाराची बळी!
महत्त्वाचं म्हणजे श्वेता पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरली आहे. याआधी तिचा पहिला पती राजा चौधरीही दारुच्या नशेत तिला मारहाण करायचा. त्यामुळेच तिने राजासोबत 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यांच्या घटस्फोटानंतर पलक आई श्वेतासोबतच राहते.

अभिनवसोबत लग्न
अभिनव कोहली हा श्वेता तिवारीचा दुसरा पती आहे. 'जाने क्या बात है' नावाच्या मालिकेत अभिनव आणि श्वेताने एकत्र काम केलं होतं. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघांनी 13 जुलै 2013 रोजी लग्न केलं आणि त्यांना रेयांश हा मुलगाही आहे. मात्र अभिनव आणि श्वेतामध्ये मागील एका वर्षापासून आलबेल नव्हतं. परंतु दोघांपैकी कोणीही याची वाच्यता केली नव्हती.

'कसौटी....' मधून करिअरची सुरुवात
श्वेता तिवारीने आपल्या करिअरची सुरुवात 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून केली होती. यामध्ये तिने प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारली होती. याशिवाय श्वेताने हिंदी बिग बॉसचं जेतेपदही पटकावलं होतं. तसं श्वेता अनेक चित्रपटांमध्येही झळकली आहे.