Neha Shitole On Vivek Agnihotri Statement On Marathi Food: 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files), 'द बंगाल फाईल्स' (The Bengal Files) फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) त्यांच्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाहीतर, त्यांनी मराठमोळ्या खाद्यपदार्थांवर, मराठी जेवणावर केलेल्या वक्तव्यामुळे. मराठी लोकांचं जेवण म्हणजे, गरिबाचं जेवण, असं म्हणत विवेक अग्निहोत्रींनी मराठी जेवणाची (Maharashtriyan Food) खिल्ली उडवली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विवेक अग्निहोत्री एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मराठी जेवणाची तुलना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीसोबत केली आहे. यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी, मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीला (Marathi Actress Pallavi Joshi) घेरलं आहे. 

Continues below advertisement


'कर्ली टेल्स'च्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री हे मराठी लोकांचं जेवण म्हणजे 'गरिबांचं जेवण' असं म्हणाले. वरण-भात, कढी याला त्यांनी नावं ठेवली. यावरुन चोहिकडून विवेक अग्निहोत्रींवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे हिनंही आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेहानं सोशल मीडियावर पोस्ट करुन संताप व्यक्त केला आहे. हा माणूस 'गरिबांचं' किंवा 'किसानांचं' जेवण म्हणजे, वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताची जवळ जवळ 25 टक्के जनता जी दारिद्र्य रेषेखाली राहते, त्यांचा अपमान करतोय, असं नेहा शितोळे म्हणाली.   






नेहा शितोळे पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालीय? 


हा व्हिडिओ पाहून माझा प्रचंड संताप होत आहे. एक एक करून सांगते... 


1. मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृती विषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस... पुढे अजुन एका रील मधे हा म्हणतोय की मी सात्विक अन्न खातो... (Plant based food) (ह्याला सावजी खायला घाला आणि तांबडा पांढरा रस्सा पाजा एकदा)


2. "गरिबांचं" किंवा "किसानांचं" जेवण म्हणजे वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताच्या जवळ जवळ 25% जनतेचा जी दारिद्र्य रेषेखाली राहते त्यांचा अपमान करतो आहे... 


3. आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे... आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही... उकडीचे मोदक सिंपल नाहीत... पुरणपोळी सिंपल नाही... 


4. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं हा विवेक अग्निहोत्री ला पडलेला प्रश्न आहे... 


5. आणि हे सगळं YouTube च्या माध्यमातून करोडो लोकं बघतायत... 


हा माणूस काश्मीर चं सत्य आपल्या समोर आणतो आहे म्हणून आपण ह्याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या मनात मुळात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार आपल्याला??? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी ह्याचे सिनेमे Boycott करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना "धडा शिकवण्याचा" आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार "वरण भाताची" किंमत आणि महत्त्व??? ह्या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे कारण हे पॉवर पोझिशन मध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात... त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत नकळत परिणाम होतो आणि आपण वरवर च्याच गोष्टी (theatre मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट OTT स्वीकारत नाही... इत्यादी) साठी भांडत बसतो... 


का भीती वाटते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची... त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का??


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


VIDEO : मराठी लोकांचा वरण भात म्हणजे 'गरीब किसानों का खाना', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने गरळ ओकली