Kiran Mane : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या अभ्यासाचा विचार सध्या सुरु असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चांमुळे सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जातीयवादाच्या राजकारणाला तोंड फुटलं आहे. त्यातच सोशल मीडियावरही अशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या चर्चेत आहेत. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील यासंदर्भात स्पष्ट भाष्य केलं आहे. त्यांनी एका महिलेचा संदर्भ देत मनुस्मृतीमधील श्लोकांचा अर्थ सांगितला आहे. 


मनुस्मृतीमध्ये असे अनेक श्लोक आहेत, ज्यामध्ये महिलांना अगदी दुय्यम स्थान दिलं असल्याचं किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शेवटी एक सवाल देखील उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की, मनुस्मृतीची शिकवण द्यायची की शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांनी त्यांना समृद्ध करायचे हे तुम्ही ठरवा, असं म्हटलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवत त्यांच्या मतांचं समर्थन देखील केलं आहे. 


किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?


किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मनुस्मृती' लिहीनारं मनू भृगू का कोन बांडगुळ हाय ते लै अवलादी असणार यात शंका नाही... आजकाल एक नग हाय बघा...जो काल एक बोलतो आणि आज बरोब्बर त्याच्या विरूद्ध बोलतो... आन् उद्या तिसरंच कायतरी बरळतो ! तसंच ते मनुस्मृती लिहीनारं किरानीष्ट बोड्याचं बेनं असनारंय.परवा एका भगिनीनं मनुस्मृतीतला एक श्लोक ऐकवला 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता' ! जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं देवताही रमतात. ती पुढं म्हन्ली, "इतका मान स्त्रियांना दिलाय मनुस्मृतीत. तुम्ही जातीयवादी आहात म्हणून तुम्हाला कळत नाहीये." व्हाॅटस् ॲप युनिव्हर्सिटीचा हा कचरा बघुन मी कपाळावर हात मारून घेतला.


किरण मानेंनी सांगितला श्लोकांचा अर्थ


किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मनुस्मृतीमधील श्लोकांचा अर्थ सांगितला आहे. त्यांनी म्हटलं की, 'तिला म्हन्लं, "ताई, स्त्री आणि शुद्रांना अक्षरश: किड्यामुंगीपेक्षा बेकार वागणूक देणार्‍या मनुस्मृतीतल्या एका श्लोकावर इतकी खुश होऊ नकोस." मग मी तिला लिस्टच दिली. मनुस्मृतीतला अध्याय दुसरा. श्लोक नंबर २१५. तिथं त्यानं लिहीलंय, "शृंगार, म्हणजेच नटणेमुरडणे करून पुरूषांना मोहित करणे हा स्त्रीस्वभाव आहे. माणूस सज्जन असो वा दुर्जन, त्याला वासनेच्या जाळ्यात अडकवण्यात स्त्रिया तयारीच्या असतात. त्यामुळे पुरूषाने तिला फार किंमत देऊ नये. स्वतःची आई-बहीण किंवा मुलीशीसुद्धा फार जवळ जाऊन अथवा एकांतात बसून बोलू नये !" दुसर्‍या अध्यायातल्याच २४६ व्या श्लोकात हा बाबा म्हन्तो, "सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तर तिला भोगण्यात कुठलेही पाप नाही.'


पुढे त्यांनी म्हटलं की, पाचव्या अध्यायात तर त्यानं दांडगा धुमाकुळ घातलाय. मनूवाद्यांना साथ देणार्‍या प्रत्येक भगिनीनं ते वाचावं असं हाय. १४८ ते १५५ व्या श्लोकांमध्ये हा सांगतो, "बाईनं बालपणी पित्याच्या आज्ञेनं वागावं. तिनं कधीच स्वतःच्या मतानं वागू नये. पिता, पती, पुत्र यांच्या ताब्यात न रहाणारी, स्वतंत्र विचाराची स्त्री ही दोन्ही घराण्यांना कलंक असते. पतीनं कितीही छळ केला तरी पत्नीनं हसतमुखानं राहावे. आपल्या वडिलांनी ज्याच्याशी आपलं लग्न लावलंय तो कसाही असो... जिवंत असेपर्यंत बाईनं त्याचीच सेवा करावी. त्याच्या मरणानंतरही तिने दुसरा नवरा करू नये. नवरा व्यसनी, जुगारी, बाहेरख्याली असला... अडाणी असला... अपंग असला तरी तिने त्याला देवासामान मानावे ! पती निधनानंतर बाईने कमी जेवण करावे. शरीरसुखापासून अलिप्त रहावे. तरच तिला स्वर्ग मिळेल."


... त्याला भुलू नका - किरण माने


याहून खतरनाक घृणास्पद गोष्टींनी खचाखच भरलेला हा ग्रंथ आहे. उगाच नाही पुस्तकांवर जीव असनार्‍या डाॅ. बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळला. एकजात सगळ्या हिंदू स्त्रियांना गुलाम ठरवनार्‍या ह्या नीच - विषारी ग्रंथाचा कुनी कितीबी उदोउदो करूद्या... त्याला भुलू नका. खोलात जाऊन अभ्यास केलात तर तुम्हाला कळंल की कुस्तीगीर महिलांचं शोषण करणार्‍या ब्रिजभूषणपास्नं ते तीन हजार महिलांवर बलात्कार करणार्‍या प्रज्वल रेवण्णापर्यन्त सगळे नराधम लोक मनुस्मृती मानणार्‍या जनावरांच्या नजरेत निर्दोष ठरतात. हे तुम्हाला मान्य आहे??? तुमच्या मुलांना मनुस्मृतीची शिकवण द्यायची की शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांनी त्यांना समृद्ध करायचे हे तुम्ही ठरवा, असा सवाल उपस्थित करत किरण माने यांनी या विषयीवर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. 



ही बातमी वाचा : 


Gulabi Sadi : बबीताजीलाही लागलं 'गुलाबी साडी'चं वेड, संजू राठोडही म्हणाला 'भारीच'; पण जेठालालच्या कमेंट्सचाच पाऊस