Jehanabad Of Love And War: घटना 17 वर्षांपूर्वीची... ज्या घटनेनं बिहारसह (Bihar) दिल्ली (Delhi) हादरली होती. दिवस होता 13 नोव्हेंबर 2005 चा... अन् शहर होतं बिहारमधलं जेहानाबाद (Jehanabad). त्या दिवशी या शहरात काळ्या कुट्ट अंधारात जी खळबळ माजवणारी घटना घडली, त्या घटनेच्या आठवणी आजही बिहारमधील नागरिकांच्या मनात ताज्या आहेत. या घटनेनंतर जेहानाबादमधील लोक भयभीत झाले होते. तो दिवस, रात्रीच्या अंधारात झालेला तुफान गोळीबार... आज 17 वर्षांनीही सर्व काही जेहनाबादमधील नागरिकांच्या मनात ताजं आहे. हा साधासुधा हल्ला नव्हता, तर हा नक्षलवादी हल्ला होता. आजही नक्षलवादी हल्ल्याचा तो दिवस आठवला की, लोक थरथर कापतात. याच घटनेवर दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांची आगामी वेब सिरीज येतेय. जिचं नाव आहे, 'जेहानाबाद : लव्ह अँड वॉर' (Jehanabad : Love And War).


सत्य घटनेवर आधारित या सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. ट्रेलरमधील काही दृश्य अंगावर शहारे आणतात. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच ही वेब सीरिज सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. सुधीर मिश्रा (Director Sudhir Mishra) दिग्दर्शित 'जेहानाबाद : लव्ह अँड वॉर' 3 फेब्रुवारी रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. जेहानाबादमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं होतं...? जाणून घेऊयात थोडक्यात... 


जहनाबादमध्ये नेमकं काय घडलं होतं...? 


13 नोव्हेंबर 2005 ची ती रात्र बिहारवासीयांसाठी काळरात्री होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या दिवशी घड्याळात रात्रीचे 9 वाजले होते. लोक रात्रीची जेवणं आटपून झोपण्याच्या तयारीत असतानाच अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले. बिहारमधील जेहानाबाद या छोट्याशा गावात नक्षलवाद्यांनी तुरुंगावर हल्ला केला होता. एवढंच नाहीतर त्यावेळी एक नाही, दोन नाही तर नक्षलवाद्यांनी तब्बल 372 आरोपींना तुरुंगातून पळून जाण्यास मदत केली. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजलं. याचे पडसाद बिहारपासून दिल्लीपर्यंत उमटले. तेव्हा बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती आणि वेळ होती निवडणुकांची. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. जेहानाबादमधील मतदान आधीच झालं होतं, त्यामुळे जेहनाबादमधील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त इतर शहरांमध्ये हलवण्यात आला होता. हिच संधी साधत नक्षलवाद्यांनी जेहानाबादमधील कारागृहावर हल्ला केला. या घटनेत नक्षलवाद्यांनी कारागृहातील सुरक्षा जवान आणि इतर कैद्यांची हत्या केली. 


तब्बल एक हजार नक्षलींनी अवघ्या काही मिनिटांत जेहानाबाद जेलवर कब्जा केला. नक्षलवाद्यांची संख्या एवढी होती की, कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेलं पोलीस दलही हतबल झालं. या कारागृहात त्यावेळी तब्बल 600 कैदी होते, त्यापैकी अनेकजण नक्षलवाद्यांचे साथीदार होते. त्यांना सोडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. निवडणुकांच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी अनेक नक्षलवाद्यांना पकडून तुरुंगात डांबलं होतं. 



अखेर नक्षलवाद्यांचा हेतू सफल झालाच 


पाहता पाहता नक्षलवाद्यांनी संपूर्ण कारागृहाचा ताबा घेतला. त्यांनी तुरुंगात बंद असलेल्या त्यांच्या साथीदारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या प्रकरणात, सर्व कैद्यांची सुटकाही झाली. त्यापैकी बरेच जण एकतर नक्षलवाद्यांमध्ये सामील झाले किंवा संधी पाहून पळून गेले. त्यावेळी त्या तुरुंगात काही नेतेही होते. नक्षलवाद्यांनी त्यांचीही हत्या केली होती. यासोबतच नक्षलवाद्यांनीही आपला लढा जनतेशी नसून प्रशासनाशी आहे, त्यामुळे सर्वांनी घरातच राहावं, अशी घोषणाही शहरभरात केली होती. जेहानाबादमध्ये तब्बल दोन तास हा गोंधळ सुरू होता. त्यावेळी जेहानाबाद पोलिसांच्या मदतीसाठी पोलिसांची एक तुकडी पाटण्याहून रवाना झाली होती. पण नक्षलवाद्यांनी त्यांनाही रोखलं होतं. 


ज्यावेळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी कारागृहात 600 कैदी उपस्थित होते. त्यापैकी  341 कैद्यांसह नक्षलवादी त्याच रात्री पसार झाले. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी कारागृहात नक्षलवाद्यांचा नेता अजय कानू अटकेत होता. त्याच्या सुटकेसाठीच नक्षलींनी हा खटाटोप केला होता. 


आश्‍चर्याची बाब म्हणजे, नक्षलवाद्यांच्या गोटाट असा काहीतर कट शिजतोय याची गुप्तचर विभागाला आधीच कल्पना होती, मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. प्रशासनाच्या याच निष्काळजीपणाचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी काही तासांसाठी राज्याच्या यंत्रणेला ठेचून खळबळ माजवली. याच घटनेचे पडसाद नंतर बिहारसोबतच देशाच्या राजकारणातही पाहायला मिळाले होते.  


दरम्यान, या घटनेचा थरार दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी वेब सीरिजच्या माध्यमातून सर्वांसमोर आणला आहे. ट्रेलर पाहूनच अंगावर शहारे येतात. दोन तरुण मोटार सायकलवरुन एका पिशवीत कापलेलं मुंडकं आणि देशी बनावटीचा बॉम्ब घेऊन जातात. त्यांचं संभाषण अत्यंत सामान्य. यावरुन जेहानाबादमधील गुन्हेगारीचं वास्तव सर्वांसमोर येतं. पण पुढे जे होतं ते अत्यंत भयानक... सत्य घटनेवर आधारीत ही वेब सीरिज गुन्हेगारीच्या या सतत वाहणाऱ्या प्रवाहातही एका प्रेमकथेभोवती फिरत असल्याचा अंदाज ट्रेलरमधून येतोय. 


सोनी लिव्हवर 'जेहानाबाद : लव्ह अँड वॉर' 3 फेब्रुवारी रोजी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केलं जाईल. शोमध्ये ऋत्विक भौमिक, हर्षिता गौर, परमब्रत चटर्जी, रजत कपूर, सुनील सिन्हा, सत्यदीप मिश्रा, राजेश जैस आणि सोनल झा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


'जेहानाबाद : लव्ह अँड वॉर' वेब सीरिजमध्ये सत्यदीप मिश्रा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर परमब्रत चटर्जी हा गुन्हेगाराची भूमिका साकारतोय. सुधीर मिश्रा यांनी यापूर्वी सोनी LIV वरील टंडन या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. हे इस्त्रायली मालिका Fouda चे अधिकृत रूपांतर आहे. मानव विज, अरबाज खान, दानिश हुसैन, एकता कौल, एमके रैना आणि रजत कपूर यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. यात सत्यदीप मिश्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mhorkya : काय म्हणता! अनिल कुंबळे 'म्होरक्या' सिनेमात? गूगलच्या गुगलीनं चर्चा, काय आहे प्रकरण...