Chhaava Movie Aurangzeb Akshaye Khanna: 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. 2025 चा सर्वात मोठा ओपनर ठरलेल्या या चित्रपटानं आतापर्यंत भल्याभल्या दिग्दर्शकांना आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका विक्की कौशलनं (Vicky Kaushal) निभावली आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकली आहे. अशातच, या चित्रपटातील अभिनयासाठी जेवढं कौतुक विक्की कौशलचं केलं जातंय, तेवढंच कौतुक मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत झळकलेल्या अक्षय खन्नाचंही होत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षयचं चालणं, त्याची डायलॉग्ज बोलण्याची पद्धत आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याचे अनेकजण फॅन झाले आहेत. पण, 'छावा'मधल्या औरंगजेबाच्या एका कृतीनं अनेकांना प्रश्न पडला आहे. एवढंच नाहीतर,'छावा'मधल्या औरंगजेबाच्या 'त्या' कृतीची तुलना 'तान्हाजी'मधल्या औरंगजेबाशीही केली जात आहे. 

खरं तर, 'छावा' आणि 'तान्हाजी'मध्ये दाखवण्यात आलेला औरंगजेब आपल्या दरबारात बसून सतत काही ना काही विणकाम करताना दिसतोय. पण, हा क्रूर औरंगजेब सतत विणतोय तरी काय?  असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत जरा खोलात जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तर मिळालेल्या माहितीनुसार, इतिहासकार सांगतात की, मांसाहार अन् दारुला शिवायचाही नाही आणि त्याचे हात सतत काहीतरी विणत असायचे... खरं तर, इस्लाममध्ये डोक्यावर टोपी घालायची परंपरा आहे.  पण, ही टोपी काहीशी वेगळी असते. जी प्रत्येक मुस्लिम पुरूष नमाज पडताना आपल्या डोक्यावर घालतो. 

इतिहासकार औरंगजेब आणि या टोपीबाबत सांगताना म्हणतात की, "औरंगजेब हा फक्त आणि फक्त स्वतःच्या हातानं विणलेलीच टोपी नमाज पढताना डोक्यावर घालायचा." तसेच, अनेक ठिकाणी असा दावाही करण्यात आला आहे की, औरंगजेब नमाज पढताना डोक्यावर जी टोपी घालायचा, ती तो स्वतःच्या हातानं विणायचा. एवढंच नाहीतर, त्याला यातून उत्पन्नही मिळत होतं. असंही सांगितलं जातं की, औरंगजेबानं आयुष्यभर टोप्या विणूस जे काही उत्पन्न मिळवलं होतं, ते त्याच्या अंत्यविधीसाठी झालेल्या खर्चासाठी वापरण्यात आलं होतं. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात औरंगजेबानं टोपी विणण्याची व्याप्ती वाढवली होती. तो आपला बराचसा वेळ विणकामातंच घालवायचा, असंही इतिहासकार सांगतात. 

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याचा सम्राट, जो अत्यंत क्रूर तर होताच, पण संपूर्ण हिंदुस्थानावर ताबा मिळवण्याचं ज्याचं स्वप्न होतं, तो अत्यंत क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाला टोप्या विणून उत्पन्न मिळवण्याची काय गरज होती? तर, असं सांगितलं जातं की, औरंगजेबाचा इस्लामबद्दलचा दृष्टीकोण अत्यंत कट्टर होता. अशातच इस्लाममध्ये टोपी घालण्याची परंपरा फार जुनी आहे. टोपीकडे धार्मिकता आणि इस्लामिक परंपरांचं पालन करण्याचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळेच औरंगजेब स्वतःच विणलेली टोपीच घालायचा. 

वरील माहिती वाचनात आलेल्या माहितीच्या आधारावर देत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही...

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं हालहाल करुन मारलं; पण त्यानंतर महाराणी येसूबाई अन् त्यांच्या मुलाचं काय केलं?