Vicky Kaushal Chhaava Movie: 'छावा' चित्रपटातून (Chhaava Movie) छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. सध्या चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं केवळ चारच दिवसांत आपलं 130 कोटींचं बजेट वसूल केलं. तर, लवकरच 'छावा' 200 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. 'छावा'नं (Chhaava) रिलीज होताच अनेक दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. 'छावा'मध्ये छत्रपती शंभू राजांचं बलिदान, त्यांची शौर्य, पराक्रम आणि त्याग दाखवण्यात आला आहे. 'छावा'मधला क्लायमॅक्स पाहून तर डोळ्याच्या कडा पाणावतात आणि आपला राजा किती पराक्रमी होता, याची जाणीवर करुन देतो. 


छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघलांनी त्यांना बंदी करुन त्यांचे हालहाल करुन मारलं. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. दुसरीकडे संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी रायगडावर जाताच, संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंनी राजारामांना छत्रपतींच्या गादीवर बसवलं आणि मराठ्यांचे छत्रपती म्हणून घोषित केलं. पण, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शहाजी यांचं काय झालं? औरंगजेबानं काय केलं? याबाबत माहीत आहे का? 


छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबानं मराठी साम्राज्याविरोधात मोठी खेळी रचली. औरंगजेबाचं एकच स्वप्न होतं... ते म्हणजे, मराठा साम्राज्याचा अंत. छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर 12 मार्च 1689 रोजी त्यांचे धाकटे बंधू राजाराम यांना छत्रपती म्हणून घोषित करण्यात आलं. संभाजी महाराजांच्या मृत्युमुळे आणि त्यांचा धाकटा सावत्र भाऊ राजाराम पहिला यानं गादी स्वीकारल्यानं आधीच मराठा राज्य अस्थिर झालं. 


त्यानंतर 13 दिवसांनी म्हणजेच, 25 मार्च 1689 रोजी मुघल सैन्यानं रायगड किल्ल्यावर हल्ला केला. स्वराज्याची राजधानी असलेला रायगडचा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नी महाराणी येसूबाई, शिवाजी महाराजांच्या आई सकवरबाई आणि शंभू महाराजांचे पुत्र शहाजी यांना मुघलांनी कैद केलं. 


राजारामांनी मराठ्यांची राजधानी दक्षिणेला जिंजीला हलवली, तर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील मराठा गनिमी कारागिरांनी मुघल सैन्यासोबतची झुंज सुरूच ठेवली. ज्यावेळी शाहू महाराजांना मुघलांनी अटक केली, त्यावेळी ते अवघ्या 7 वर्षांचे होते. फेब्रुवारी 1689 पासून 1707 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत 18 वर्ष शाहू महाराज मुघलांच्या कैदेत राहिले. त्यानंतर शाहूंना औरंगजेबाचा मुलगा सम्राट मुहम्मद आझम शाह यानं मुक्त केलं. त्यामागे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचंच कपट मुघलांच्या मनात होतं. शाहू महाराजांनी सुटकेनंतर त्यांची काकी महाराणी ताराबाई (राजाराम महाराजांच्या पत्नी) यांच्याशी युद्ध करावं लागलं. छत्रपतींच्या गादीसाठी शाहू महाराजांनी आणि ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी दुसरा याच्यासाठी दावा केला होता. दोघांमध्ये युद्ध झालं.


शाहूंची अटीशर्थींसह सुटका करण्यात आली होती. तसेच, शाहू महाराजांनी त्यांच्या सुटकेच्या अटींचे पालन करावं, यासाठी मुघलांनी येसूबाईंना बंदिवान ठेवलं. 1719 मध्ये शाहू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली मराठे बळकट झाले तेव्हा येसूबाईंची सुटका करण्यात आली. दरम्यान, मधल्या काळातल्या बऱ्याच घडामोडींनंतर मराठा साम्राज्याची सुत्रं पेशव्यांच्या हाती गेली. त्यापूर्वीच 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. 


(वरील माहिती काही वाचलेल्या बाबींच्या आधारे देण्यात आलेली आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)