सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा सुरुवातीवासूनच चर्चेत होता. असायला हवाच. कारण, यात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या भूमिका होत्या. प्रत्येक गोष्टीत हृतिक रोशनच्या खांद्याला खांदा लावू शकणारा पण अनुभवाने त्याच्यापेक्षा कमी असलेल्या टायगरला हृतिकसोबत भिडवायचा विचार सिद्धार्थ आनंदनं केला आणि त्याला अनुसरुन गोष्ट बांधली. आता सर्वसाधारण विचार केला तर हे दोघे तगडे, दिसायला देखणे, डान्समध्ये एक नंबरी असलेले नायक घेतले तर या गोष्टीत काय काय असेल? साहजिकच या गोष्टीत हाणामारी असेल.. नाच असेल.. गाणी असतील पण नाचगाण्यांपेक्षा हाणामारीची अशक्य दृश्ये यात ठासून भरलेली असतील शिवाय हा सगळा मामला श्रीमंती असेल.. असे कयास आपण बांधले असतील तर ते अजिबात चुकीचे नाहीत. वॉर आपल्या या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो.


आदित्य चोप्रा आणि त्यांच्या टीमला खिळवून कसं ठेवायचं याची पूर्ण कल्पना आहे. प्रेक्षकांसमोर इतकी मोठी, भव्य आणि नेत्रदिपक दृश्य ते उभी करतात की आपले विचार बंद होऊन त्या भव्य पडद्यावर जे काही साकारते आहे ते पाहण्याकडे आपला कल राहतो. इथेही तसंच होतं. अगदी पहिल्या दृश्यांपासून हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो. सिनेमाची सुरुवातच चक्रावून टाकणारी आहे. म्हणजे असं की एक ज्येष्ठ कोणीतरी जो साधारण भारतीय सैन्याशी संबंधित असावा असा माणूस फोनवर बोलतोय. त्यात तो एका शार्प शूटरशी बोलतोय. आता शार्प शूटरने नेम लावलेला आहे. सावज त्या शूटरच्या टप्प्यात आलं आहे. हा ज्येष्ठ इसम त्याला शूट करण्याचा हुकूम देतो. शार्प शूटर चाप ओढतो आणि ती गोळी त्याच ज्येष्ठ इसमाला लागते. ती गोळी चालवणारा असतो कबीर अर्थात द हृतिक रोशन. आता मग आपल्याच माणसाला हा कबीर का मारतोय.. भारतीय सैन्याचा अत्यंत वाकबगार सैनिक फितूर झाला कसा.. अशा अनेक शक्यता तयार होतात आणि त्यातूनच त्याच्यावर मात करण्यासाठी कबीरचाच चेला असलेल्या खालीदची नियुक्ती केली जाते. पण खालीद कबीरचा पाठलाग करतो. कबीर एकेक आपल्याच माणसांना मारतो आहै आणि खालीद त्याला पकडायचा प्रयत्न करतो आहे.. तर असा हा पाठलाग आहे. पण यात इतर अनेक पडदे आहेत. म्हणजे, कबीर कोण होता.. खालीद कोण होता.. कबीरला खालीद कसा मिळाला.. तो चेला कसा झाला.. इथपासून भारताया जो काही इलाही नावाचा दहशतवादी आहे त्याला थांबवणंही कसं महत्वाचं आहे, यावरही जोरदार चर्चा चालू आहे. तर असा हा पाठलाग सात देश आणि 27 शहरांमधून सुरु होतो आणि मग वॉर उसळतं.

हम तुम, ता रा रम पम, अंजाना अंजानी, बचना ए हसीनों, बॅंग बॅंग हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही सिनेमे. सुरुवातीला रोमकॉमकडून त्यांनी आपला मोर्चा देमार पटांकडे वळवला. गेल्या चार वर्षांपासून आनंद वॉरवर काम करत आहेत. या सिनेमाला आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत. नॉन लिनिअर फॉरमॅटची पटकथा असल्यामुळे हा सिनेमा सलग घडत नाही. तो भूत वर्तमानकाळात फिरतो. अनेक देशांतून सुरु होऊन कबीर आणि खालीदवर थांबतो. शबाब, शराब आणि हाणामारी याचं कॉम्बिनेशन यात आहे. फक्त वॉर बघून असं वाटत राहतं की जरा आणखी गोष्ट यात हवी होती. म्हणजे यात गोष्ट आहे. जी मघाशी जेवढी सांगितली तेवढी गोष्ट तर यात आहेच. पण बाकी सिनेमात फक्त हाणामारी आहे. उलट जो भाग गोष्टीचा भाग म्हणून येतो अगदीच उदाहरण द्यायचं तर मध्यंतरानंतरच्या ट्रॅकचं देता येईल. त्यावेळी तर सिनेमा ताणल्यासारखा वाटतो. कारण इतर सिनेमात अॅक्शन आणि धावपळ इतकी आहे की त्याचीच सवय होते. उत्तम लोकेशन्स.. दिसायला सगळे देखणे कलाकार. झकास पार्श्वसंगीत.. भरघच्च केलेला खर्च यामुळे सिनेमा श्रीमंती दिसतो. फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नायक जेव्हा पोहोचतो किंवा कोणीही कुठूनही पोहोचतो त्यावेळी तो कुठून कसा पोहोचला हे कळत नाही. म्हणजे, आत्ता ते केरळाच्या बॅकवॉटरमध्ये असतात. दुसऱ्या क्षणी त्यातला खलनायक अंटार्क्टिकातल्या बर्फाळ प्रदेशातल्या जहाजावर असतो. तेवढ्यात तिथे नायकही पोहोचतो. आणखी एक उदाहरण देऊ.. एका ठिकाणी हाणामारी होते. तिथल्या फितूराचा मार्ग काढत खालीद त्याच्या मागोमाग जातो. इकडे कबीर आणि खलनायकाची चकमक सुरु आहे. पण नंतर गोळीबार होतो त्यावेळी खलनायक तिथे पोहोचलेला असतो ते कसं तेही कळत नाही. पण इथली लोकेशन्स आणि पडद्यावर दिसणारे तगडे, देखणे कलाकार यांच्या उपस्थितीमुळे मात्र हा विचार मनात येतो आणि मग पुढे विचार करता येत नाही कारण पडद्यावर चकित करणारी हाणामारी सुरु असते. असं सगळा प्रकार होताना दिसतो.

संकलन, छायांकन, संगीत, पार्श्वसंगीत चांगलं आहे. पण गाण्याबद्दल यातलं हृतिक आणि टायगरची गाणी एकदम मध्येच येतात. एक नक्की यातली अॅक्शन सॉलिड आहे. टायगर, हृतिकने यावर भारी मेहनत घेतली आहे. वीणा कपूरही छोट्या भूमिकेत दिसतेय. सोबत आशुतोष राणाही आहे. अजित शिधये या आपल्या पुण्याच्या मराठी कलाकारानेही यात एक छोटी भूमिका निभावली आहे. या सिनेमावर खर्च सॉलिड केला आहे. उत्तम लोकेशन्स हा सिनेमा दाखवतो. जबरदस्त अॅक्शन, पाठलाग यात दिसतो. यातली विमानातली अॅक्शन तर लाजवाब आहे. फक्त सिनेमाला गोष्ट हवी होती ती दिसत नाही. ती दिसायला हवी होती. असं असलं तरी हा सिनेमा चालेल. लोकांना आवडेल हे नक्की. फक्त समोर जे घडतंय ते बघत राहायचं. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार्स.

हृतिक, टायगरला बघायचं असेल तर हा सिनेमा पाहायला हवा.