Salman Khan House Firing :   बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई  पोलिसांनी आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या सगळ्या आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सोमवारी सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले. सलमान खानच्या घरावरील गोळीबार हा खंडणीसाठी केला असल्याचे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आरोपपत्रात म्हटले आहे. 


बिश्नोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसह पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींविरोधातही आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, राज्यात बिष्णोई गँगला खंडणीच रॅकेट वाढवायचं होते. खंडणी उकळण्याच्या उद्देशानेच  बिश्नोई गँगकडून सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.


सलमान खानने आपल्या जबाबात काय म्हटले?


सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देऊन त्याच्या घरावरती गोळीबार करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले. सलमान खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातही खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न दिसतोय असाच जबाब दिला आहे. बिश्नोई गँगच्या या कृत्यांमुळे मी आणि माझं कुटुंब भीतीच्या वातावरणाखाली जगत आहोत असेही सलमानने मुंबई पोलिसांना जबाब सांगितलं.


या गोळीबार प्रकरणानंतर महाराष्ट्रात खंडणीच नेटवर्क मजबूत करण्याचा बिश्नोई गँगचा प्रयत्न होता. मुंबई पोलिसांनी सतराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यामध्ये अनमोल बिष्णोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या विरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 


सलमान खानच्या घरावर झाला होता गोळीबार


मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी 72 तासांमध्ये सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या.  या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यानंतर देशातील इतर राज्यांमधून आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली.


इतर महत्त्वाची बातमी :