साधारण आठेक वर्षांपूर्वी ज्यावेळी अगडबम नावाचा सिनेमा आला तेव्हा तृप्ती भोईर या अभिनेत्रीचं मला व्यक्तिगत पातळीवर खूप कौतुक वाटलं होतं. कौतुक अशासाठी की शरीरीवर मेकअपचा थर चढवून त्यानी यांचं शूट केलं होतं. मराठीतला तो पहिल असा प्रयोग मानला गेला आणि सिनेमापेक्षा अगडबम साकारणारी नाजुका नायिका ठरली होती. आता जवळपास आठ वर्षांनी पुन्हा तृप्ती यांनी माझा अगडबम हा सिक्वेल तयार केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे आणि मुख्य भूमिकाही.


एक बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी ही या आठ वर्षांत मराठी सिनेमा बदलला आहेच. पण आताशा हिंदी सिनेमाही खूप सशक्त होऊ लागला आहे. एकीकडे २.० सारखे ग्राफिकली लोडेड सिनेमे येऊ लागलेत तर अंधाधुन, दंगल सारखे आशयपूर्ण चित्रपटही दाखल होऊ लागले आहेत. या सगळ्याशी मराठी चित्रपटाला स्पर्धा करावी लागते आहे. अगदी पटकन उदाहरण द्यायचं तर लठ्ठपणावर  भूमी पेडणेकरचा 'दम लगा के..' आला होता. दंगलमध्ये आमीर खानने वजन वाढवण्यावर भर दिला होता. या दोघांनाही प्रोस्थेटिक करता आलं असतं. पण तसं न करता त्यांनी वजन वाढवण्यावर भर दिला. कारण मुळात लठ्ठ झाल्यानंतर देहबोली बदलते. हातवारे, चालढाल बदलते. त्यात निसर्गदत्त गोडवा येण्याची शक्यता निर्माण होते. असा सगळा प्रवाह एकिकडे वहात असताना, तृप्ती भोईर यांनी माझा अगडबम आणला आहे. यात त्यांनी प्रोस्थेटिकचा वापर केलेला दिसतो. एक नक्की की पहिल्या भागापेक्षा बऱ्याच बाबतीत सुधारणा झालेल्या दिसतात.

या चित्रपटाची गोष्ट अशी, रायबा आणि नाजूका हे बेढब जोडपं. पण रायबाचा नाजुकावर भयंकर जीव. नाजुकाच्या लठ्ठपणामुळे रायबालाही टोमणे खावे लगतायत. पण त्याची त्याला फिकीर नाही. नाजुकाचे वडील वस्ताद आहेत. राज्यातले नामवंत पैलवान आहेत. त्याचा नाजुकाला कोण अभिमान. सगळ आलबेल असताना, नाजुकाच्या वडिलांसोबत एक प्रसंग घडतो. त्याने वडील पुरते गळून जातात. झालेल्या अपमानाने निराश होतात. नाजुकाला वडिलांची ही अवस्था पाहावत नाही. त्यानंतर ती एक निर्णय घेते. त्या निर्णयाची ही गोष्ट आहे.

एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करावी वाटते ती अशी की सिनेमा या माध्यमाचं आपलं असं एक सौंदर्यशास्त्र आहे. सिनेमा कोणताही असो. रहस्य, गूढ, भय, विनोदी आदी कोणत्याही बाजाचा चित्रपट असला तरी, त्याला आपलं असं सौंदर्य असतं. त्यामुळे सिनेमा प्रेक्षणीय होतो. त्या सौंदर्यशास्त्राची मोठी उणीव हा चित्रपट पाहताना भासते. नाजुकाच्या एंट्रीपासून तिचं वावरणं.. तिचे हावभाव आणि इतर व्यक्तिरेखांच्या दिसण्याअसण्यापासून त्याची उणीव जाणवते. त्यामुळे नाजुकामध्ये असलेला गोडवा निघून जाऊन ती अंगावर येऊ लागते. त्याहीपेक्षा प्रोस्थेटिक लावल्यामुळे नाजुका दिसते जाड. पण तिच्या नाचण्यातला, बोलण्यातला, चालण्यातला गोडवा निघून जातो. अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी कष्टाने नाजुका साकारली आहे यात शंका घेण्याचं कारण नाही. पण ते करत असताना, प्रोस्थेटिक लावल्यामुळे तृप्ती यांच्या चेहऱ्यावरही बऱ्याच मर्यादा आल्या आहेत.

चित्रपटाचं कथानव वरकरणी ठीक असलं तरी त्याची पटकथा करताना त्यात येणारे प्रसंग हे तर्कहीन वाटू लागतात. वडिलांचा बदला घेण्यासाठी नाजूका ज्या गोष्टी करते, ते अत्यंत बेगडी वाटू लागतं. त्यामुळे सिनेमा विनोदी न उरता हस्यास्पद ठरू लागतो. छायांकन, संकलन, संगीत या गोष्टी एका पातळीवर अपेक्षा पूर्ण करतात, पण मुळात सिनेमाचा गाभा भरीव नसल्याने या बाजूंना तितका अर्थ उरत नाही.

तृप्ती यांनी हट्टाने अनेक वर्ष राबून हा चित्रपट बनवला याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण तो बनवताना कथा, पटकथा आणि संवाद या पातळ्यांवर गोष्ट आणखी नीटस असायला हवी होती. चित्रपट आपल्याला निराश करत असला, तरी दिग्दर्शिकेचं या संकल्पनेवरचं प्रेम दिसतं. त्यासाठीचे कष्ट दिसतात. म्हणूनच या चित्रपटाला पिक्चरबिक्चरमध्ये आपण देतो आहोत दोन स्टार्स.

माझा अगडबम संपता संपता या चित्रपटाचा तिसरा भागही आपण बनवणार असल्याचं दिग्दर्शिका सांगते. या तिसऱ्या भागाकडून मात्र मोठ्या अपेक्षा बाळगायला हव्यात. शिवाय दिग्दर्शिकेनेही चित्रपटाच्या बदलत्या प्रवाहाकडे लक्ष ठेवून असायला हवं.