चेन्नई : चित्रपट अभिनेत्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. करुणानिधी, एमजीआर, जयललिता, विजयकांत अशा कित्येक कलाकारांनी चित्रपटातून सुरु केलेली कारकीर्द राजकीय आखाड्यापर्यंत नेली. या यादीत आणखी दोन कलाकाराची नाव जोडलं जाणार आहेत.. एक म्हणजे थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांत... आणि दुसरा कमल हासन.


रजनीकांत असो वा कमल हासन... दोघांनीही अनेक वेळा राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेले जवळचे संबंध पाहता, रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ज्या राज्यात भाजपचं अस्तित्वच नाही, तिथे थलैवा भाजपला पाठिंबा कसा देणार, असा प्रश्न होता. त्यातच रजनीकांत यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करुन अनेकांना धक्का दिला आहे.

सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, नव्या पक्षाची स्थापना


एआयएडीएमकेच्या प्रमुख जयललिता यांच्या निधनानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या वयोमानामुळे तेही राजकीयदृष्ट्या सक्रीय नाहीत. त्यामुळे रजनीकांत यांचा राजकीय उदय आशादायक मानला जात आहे. परंतु रजनीकांत यांचा राजकीय इतिहास पाहता, जनतेने त्यांना नाकारलंच आहे. अभिनेता म्हणून चाहत्यांनी त्यांना जितकं भरभरुन प्रेम दिलं, तितकंच राजकीय पटलावर त्यांना झिडकारलं गेलं.

रजनीकांत यांचा राजकीय इतिहास

'जर जयललिता जिंकल्या, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकत नाही' असं वक्तव्य 21 वर्षांपूर्वी म्हणजे 1996 मध्ये रजनीकांत यांनी केलं होतं. त्यानंतर अण्णाद्रमुकचा सपाटून पराभव झाला होता. त्यावेळी रजनीच्या विधानातील ताकद पाहायला मिळाली.

1998 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये रजनीकांतने भाजपला समर्थन दिलं होतं, मात्र भाजप फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यावेळी मात्र एआयएडीएमकेने 30, तर द्रमुकने 9 जागा जिंकल्या होत्या.

2004 मध्ये रजनीकांत यांनी पीएमकेला मतदान करण्याचं आवाहन केलं, मात्र पक्षाला एकही जागा मिळाली नाही.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदींनी रजनीकांतची भेट घेतली होती. देशात भाजपला बहुमत मिळालं असलं, तरी तामिळनाडूत भाजपला फारशी चमक दाखवता आली नाही

तामिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री घेत रजनीकांत यांनी हादरे देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो कितपत यशस्वी होणार, हे येत्या काळात पाहायला मिळेल.