मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये कलम 376 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आलोकनाथांनी 20-25 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप लेखिका विनता नंदा यांनी केला होता.


अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'मी टू' मोहीम छेडल्यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. लेखिका विनता नंदा यांनीही कैक वर्षांपूर्वीची आपबिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून 8 ऑक्टोबरला सर्वांसमोर मांडली होती.

आलोकनाथ यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री हिमानी शिवपुरी, संध्या मृदुल यांनीही केला. त्याचप्रमाणे आलोकनाथांचा हा चेहरा माहित असल्याची कबुलीही अनेक कलावंतांनी दिली होती. अगदी 'तारा'फेम अभिनेत्री नवनीत निशान यांनीही आरोपांना दुजोरा दिला.

'सिन्टा' या मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे प्रश्न मांडणाऱ्या असोसिएशननेही आलोकनाथ यांना नोटीस पाठवली होती. 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख असलेल्या आलोकनाथ यांचा वेगळा चेहरा समोर आल्याने चाहतेही अवाक झाले.

विनता नंदा यांच्या आरोपांनंतर जवळपास दीड महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यानच्या काळात आलोकनाथ यांनी विनता यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

विनता नंदा यांची फेसबुक पोस्ट

'त्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पित बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितलं, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो' असं विनता नंदांनी लिहिलं होतं.

'त्या व्यक्तीने (अलोकनाथ) आपल्या घरी आयोजित केलेल्या पार्टीला मी गेले होते. काही मित्रही तिथे होते. माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं आहे, असं मला वाटत होतं. मला जरा वेगळंच जाणवायला लागलं. रात्री दोनच्या सुमारास मी पार्टीतून निघाले, पण कोणीच मला घरी सोडायला येण्याची तयारी दाखवली नाही, हे मला जरा विचित्रच वाटलं. तिथे फार काळ थांबणं मला ठीक वाटत नव्हतं, त्यामुळे घर लांब असूनही मी पायी जाण्याचं ठरवलं' असं विनता यांनी पुढे लिहिलं होतं.

'अर्ध्या रस्त्यात असताना त्याने (अलोकनाथ) माझ्याजवळ गाडी थांबवली आणि मला घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. त्याच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले. त्यानंतर नेमकं काय झालं हे मला अंधुक आठवतंय. पण माझ्यावर दारु उडवली जात होती आणि माझं लैंगिक शोषण केलं जात होतं. मी दुसऱ्या दिवशी झोपेतून उठले, तेव्हा वेदनेची जाणीव झाली. माझ्यावर फक्त बलात्कार झाला नव्हता, तर माझ्याच घरात माझ्यावर भीषण अत्याचाराचा झाले होते' असा दावा विनता यांनी केला होता.

विनता नंदा यांची फेसबुक पोस्ट