मुंबई : खरंतर ही गोष्ट फार कुणाला माहित नाही. अगदी माहित असेल तर ती गेल्या पिढीतल्याच काही लोकांना माहीत असेल. कारण, ती घटना घडल्यानंतर मंगेशकर कुटुंबिय या घटनेबद्दल फार काही बोलत नाहीत. पण भारतीय सिनेसंगीताचा स्वर्गीय स्वर अर्थात गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनीच खुद्द काही गोष्टी बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत. त्या मुलाखतीनुसार लता मंगेशकर यांना फार पूर्वी विषबाधा झाली होती हे पुन्हा समोर येतं. ही बाब सांगतानाच, काही अफवांनाही त्यांनी फेटाळून लावलं आहे.


हे साल होतं 1963 चं. तेव्हा लता मंगेशकर हे नाव संपूर्ण भारताला माहित झालं होतं. त्यांच्या आवाजाची जादू सर्वदूर पसरली होती. लतादीदींना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. आणि नेमकं हे घडत असताना तो दिवस उगवला. याबद्दल बोलताना लतादिदी म्हणतात, 'ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही कोणीही मंगेशकर कुटुंबीय त्या दिवसांबद्दल फार बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती. त्यावेळी मी झोपून होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. हा प्रकार इतका भयावह होता की मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालेन की नाही असाच प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता.' लता मंगेशकर यांची तब्येत खालावली होती. साहजिकच गाणं बंद होतं. त्यामुळे त्यावेळी अनेक तर्कवितर्कांना ऊत आला होता. त्यातलीच त्यावेळची एक चर्चा होती ती, लता मंगेशकर कदाचित यापुढे कधीच गाऊ शकणार नाहीत ही. पण लता दिदींनी ती अफवा असल्याचं सांगत हा मुद्दा फेटाळून लावला. त्या म्हणतात, 'मला अशक्तपणा आला होता हे खरं आहे. पण मी गाऊच शकणार नाही असं मला कुणीही सांगितलं नव्हतं. तशी शक्यताही नव्हती. त्यावेळी आमचे फॅमिली डॉक्टर होते आर.पी. कपूर. त्यांनी माझी खूपच काळजी घेतली. उलट मी कधी एकदा स्वत:च्या पायावर उभी राहतेय असं त्यांना झालं होतं. खरंतर त्यांचे आभार आहेत.' हा विषप्रयोग झाल्यानंतर पुढचे तीन दिवस लता मंगेशकर पूर्णत: बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यानंतर हळूहळू त्या यातून सावरल्या.


लता मंगेशकर यांनी त्यानंतर काही काळ आराम केला. त्यांना गायचं तर होतं. पण रेकॉर्डिंग करावं की नाही असा विषय होता. त्यावेळी त्यांच्या घरी आले ते गायक-संगीतकार हेमंतकुमार. त्यांच्या एका चित्रपटासाठी लतादिदींनी गावं असा त्यांचा आग्रह होता. ही आठवणही लतादिदी सांगतात. 'त्यावेळी हेमंत कुमार आमच्या घरी आले. त्यांना एका गाण्याचं रेकॉर्डिंग करायचं होतं. पण मी गावं की नाही असा संभ्रम होता. हेमंतदा माझ्या आईला भेटले. आईने परवानगी दिली पण एका अटीवर. मी गाताना मला आवाजाला जराही ताण येतोय वा कोणताही त्रास होतोय असं जाणवलं तर मला तडक घरी सोडलं जाील अशी ग्वाहीच हेमंत कुमार यांनी दिली. त्यानंतर मी रेकॉर्डिंगला गेले. या आजारातून उठल्यावर मी पहिलं गाणं गायले ते 'कही दीप जले कही दिल' हे 'बीस साल बाद'मधलं गाणं. त्यानंतर मात्र मला फार त्रास झाला नाही.'


त्यावेळी झालेल्या उपचारात लता दिदींना विषबाधा झालीय हे निष्पन्न झालं होतं. यातल्या उपचारासाठी लतादिदी थोडे थोडके नव्हे तर तब्बल तीन महिने गादीला खिळून होत्या. पण त्यातून बाहेर यायची त्यांची जिद्द आणि योग्य वैद्यकीय उपचारांनी ते शक्य करुन दाखवलं.


यावेळी मजरुह सुलतानपुरी यांची आठवण मात्र त्या आवर्जून काढतात. लता दिदी आजारी आहेत हे कळल्यानंतर मजरुह सुलतानपुरी रोज सायंकाळी लताबाईंच्या घरी जात. 'मजरुह साब त्यावेळी कमालीचे व्यग्र होते. त्यांना पुरेशी झोपही मिळत नसे. पण त्यातून वेळात वेळ काढून मजरुह साब रोज मला भेटायला यायचे. मला कविता ऐकवत असत. त्यामुळे मला जरा बरं वाटत होतं. मजरुह साब यांनी माझी खूपच विचारपूस केली. बऱ्याचदा माझ्यासाठी मला पचेल असं जेवणही ते घेऊन यायचे.'


हा विषप्रयोग कुणी केला होता?
या मुलाखतीच्या शेवटी अर्थातच ही विषबाधा कुणामुळे झाली होती हा प्रश्न येतोच. त्यावेळी लतादिदींनी दिलेलं उत्तर ऐकून थक्क व्हायला होतं. त्या म्हणतात, 'माझ्यावर झालेला विषप्रयोग नेमका कुणी केलाय ते आम्हाला कळलंच. पण त्याच्याविरोधात आम्ही काही अॅक्शन घेतली नाही. कारण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी माणसाच्या अशा वागण्याचं नवल वाटलं होतं हे नक्की.'