Kangana Ranaut on Subhash Chandra Bose : अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) हिला भाजपकडून (BJP) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha 2024) दिल्यापासून ती बरीच चर्चेत आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. काही दिवसांपूर्वी कंनगनाने सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंगनाला बऱ्याच प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं. या सगळ्यावर कंगनाने प्रत्येकाला उत्तर दिलं आहे. कंगनाने ट्वीट करत या सगळ्यावर भाष्य केलं. 


कंगनाच्या उमेदवारीवर टीका करताना काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती.  त्यानंतर आता कंगनाने पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे सूर्य असून विरोधी पक्ष नेते मेणबत्तीच असल्याचंही कंगनाने म्हटलं होतं. त्याचप्रमाणे ती सध्या काँग्रेसवरही जोरदार टीकास्त्र सोडत असल्याचं पाहायला मिळतंय. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले असल्याच्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचंही तिनं यावेळी म्हटलं आहे. 


सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी कंगनानं काय म्हटलं होतं?


कंगना रणौतने आझाद हिंद फौजचे संस्थापक असलेले महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याचे म्हटले. कंगनाने म्हटले की, एका व्यक्तीने आपले रक्त सांडून स्वातंत्र्य दिले. जर्मनी ते जपानपर्यंत स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यांना देशाचे पंतप्रधान का केले नाही,  अखेर ते कुठे अचानक अदृश्य झाले असा सवाल कंगनाने केला. जे तुरुंगात बसून टीव्ही पाहायचे ते सरकारमध्ये आले. आझाद हिंद फौजेच्या जवानांना कारवाईला सामोरे जावे लागले, अनेकजणांना गायब करण्यात आले असल्याचा दावाही कंगनाने केला. 


कंगनाचं नेटकऱ्यांना उत्तर


दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलच फैलावर घेतलं होतं. त्यावर आता कंगनाने स्पष्टीकरण दिल्याचं समोर आलं आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एनडीटीचा एक स्क्रिनशॉट शेअर करत सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावर तिनं म्हटलं की, 'जे मला भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी हा स्क्रीनशॉट वाचावा. नवशिक्यांसाठी येथे सामान्य ज्ञान आहे. जे प्रतिभावान लोक मला अभ्यास करायला सांगत आहेत त्यांना हे माहित असावे की मी एमरजन्सी नावाचा चित्रपट लिहिला आहे. त्यात अभिनय आणि दिग्दर्शनही केले. त्याची कथा प्रामुख्याने नेहरू कुटुंबाभोवती फिरते. त्यामुळे कृपया दिशाभूल करू नये. जर मी तुमच्या IQ च्या पलीकडे बोलले तर तुम्हाला असे वाटू लागते की मला याबद्दल माहित नाही. त्यामुळे इथे तुमचीच वाईटरित्या फजिती झाली आहे.


कंगनाने जो स्क्रिनशॉट शेअर केला आहे, त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, '21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वातंत्र्य सेनानी नेताजींनी सिंगापूरमध्ये आझाद हिंद (स्वतंत्र भारत) सरकारची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धाच्या घोषणेच्या वेळी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःला पंतप्रधान, राज्यप्रमुख आणि युद्धमंत्री घोषित केले होते.'




ही बातमी वाचा : 


Kangana Ranaut : कंगना रणौतचा सवाल, सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान, त्यांना भारतात...