Labour Day 2024 :  भारतीय चित्रपटांमध्ये अनेकदा आपल्या भोवतलाच्या घटनांचे पडसाद दिसते. मग, यामध्ये एखादी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कथानकाची गोष्ट असो किंवा एखादा राजकीय घटनांवर आधारीत असलेला चित्रपटांचा समावेश करता येईल. सिनेसृष्टीत समांतर चित्रपट चळवळ सुरू असताना पडद्यावर वंचित, शोषित घटकांचा आवाज मांडणाऱ्या घडामोडी दिसून येत असे. 



जागतिकीकरण, उदारीकरणाचा काळ सुरू झाल्यानंतर मात्र चित्रपटांच्या कथानकात, पडद्यावर दिसणारे ग्लॅमरसही झपाट्याने बदलले. कधीकाळी भारतीय चित्रपटसृष्टीत कामगार-श्रमिक आणि गरीब वर्गांच्या वेदनांचा हुंकार असायचा. त्यांचे प्रश्न मांडले जायचे.  आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने (International Labour Day) जाणून घेऊयात अशाच काही चित्रपटांबाबत...


दो बिघा जमीन (Do Bigha Zamin) 


भारतीय सिनेसृष्टीतील क्लासिक सिनेमांच्या यादीत  दो बिघा जमीन या चित्रपटाचे स्थान आहे. बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याच्या संघर्षाची कथा आहे.  हा चित्रपट मजुरांच्या शोषणावर प्रभावी भाष्य करणारा आहे. बलराज साहनी यांनी शंभू महातो या शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. कर्ज फेडण्यासाठी शंभूला शेती सोडून रिक्षाचालक म्हणून उदरनिर्वाहासाठी कोलकाता येथे स्थलांतर करावे लागते. त्यानंतर त्याच्यासमोर येणाऱ्या अडचणी, त्याचा संघर्ष चित्रपटात आहे. चित्रपटातील धरती कहे पुकार के, अजब तेरी दुनिया ही गाणी आजच्या काळातही लागू होतात. 


मदर इंडिया (Mother India)


सावकारी कर्जाच्या पाशात अडकलेल्या महिला शेतकरीच्या जीवनाचा संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा चित्रपट म्हणजे देशातील महिला श्रमिकांच्या संघर्षाला केलेला सलाम आहे. गावातील सरंजामदार जमिनदारांकडून शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे होणारे शोषण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतीली अजरामर असलेल्या कलाकृतींपैकी एक आहे.  या चित्रपटाला ऑस्करसाठीचे नामांकन मिळाले होते. 


नया दौर (Naya Daur) 


दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांच्या नया दौर या चित्रपटात स्वातंत्र्याच्या काळानंतर सुरू असलेल्या औद्योगिकीकरणाच्या मुद्यावर हा चित्रपट भाष्य करतो. गावात परिवहनासाठी घोडागाडी ऐवजी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, बसमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल या मुद्यावर गावातील स्थानिक त्याला विरोध करतात. अखेर बस आणि घोडागाडी यांच्यात शर्यत होते. 


गरम हवा (Garam Hawa)


एम. एस. सथ्यू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात भारत-पाकिस्तानच्या फाळणीचा सामाजिक-राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कसा परिणाम झाला. यावर भाष्य करतो. श्रमिक वर्गावरदेखील कसा परिणाम झाला, त्यांनी कसा सामना केला यावर चित्रपटात वर्णन आहे. बलराज सहानी यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. त्यांचा हा अखेरचा चित्रपट ठरला.  


मजदूर  (Mazdoor)


रवी चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दिलीपकुमार, राज बब्बर, स्मिता पाटील यांच्या भूमिका आहेत.  या चित्रपटात कामगारांचे शोषण, त्यांचा संघर्ष याचे चित्रण करण्यात आले आहे. कामगारांचा विचार करणारा, उदारमतवादी मालकाच्या निधनानंतर कारखान्याची सगळी सूत्रे त्याच्या मुलाच्या हाती येतात. त्यानंतर कामगारांच्या अधिकच्या मेहनतीवर अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्याला कामगार विरोध करतात.त्यातून संघर्ष सुरू होतो. कामगार स्वत: कारखाना काढतात आणि यशस्वीपणे चालवतात. 


या चित्रपटात चांगला सामाजिक संदेश, भारतातील कामगारांची अवस्था, श्रीमंत उद्योगपतींकडून कामगारांचे होणारे शोषण आणि न्याय्य वेतन आणि कामाच्या परिस्थितीसाठी कामगार चळवळीच्या संघर्षांवर प्रकाश टाकतो. प्रख्यात कवी फैज अहमद फैज यांच्या "हम मेहनतकश इस दुनिया से जब अपना हिसा मांगेगे" हे गीत चांगलेच लोकप्रिय झाले होते. 


झ्विगॅटो (Zwigato)


अभिनेत्री नंदिता दासने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मोठ्या कालावधीनंतर श्रमिक, कामगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न झाला. हा चित्रपट लॉकडाउनमध्ये एका कंपनीतील मॅनेजरची नोकरी गमावल्यानंतर घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी फूड डिलिव्हरीचे काम स्वीकारणाऱ्या मानस सिंहची गोष्ट सांगतो. बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमधील मुख्य प्रवाहातील चित्रपटात श्रमिक वर्गाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. Working Class चे प्रश्न, त्यांचे संघर्ष रुपेरी पडद्यावरून काहीसे दूर गेले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ही उणीव काही प्रमाणात भरुन निघाली. मागील काही काळात बदललेली आर्थिक परिस्थिती, भांडवली व्यवस्थेत झालेले बदल, कारखान्यात उत्पादन करत असलेल्या संघटित कामगारांच्या तुलनेत असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या वाढत आहे. त्यांचे प्रश्न, शोषणाचे स्वरुप संघटित क्षेत्रातील कामगारांपेक्षा भिन्न आहेत. याच मुद्यावर हा चित्रपट काही प्रमाणात भाष्य करतो.