Anuradha Paudwal Birthday: आपल्या सुमधुर आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) आज आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुराधा पौडवाल यांनी आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. लाईमलाईटपासून दूर राहणाऱ्या अनुराधा पौडवाल यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. अनुराधा पौडवाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. अनुराधा पौडवाल हे संगीतविश्वातील ते एक मोठे नाव आहे. मात्र, त्या मागील बऱ्याच काळापासून चित्रपट आणि संगीत विश्वापासून दूर आहेत.


अनुराधा पौडवाल यांनी 'अभिमान' या चित्रपटात एक छोटासा श्लोक गाऊन आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली होती. अनुराधा पौडवाल यांनी 1990 ते 1992 असे सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जिंकून विक्रम रचला होता. ‘नजर के सामने’ (आशिकी), ‘दिल है की मानता नहीं’ (दिल है के मानता नहीं), ‘धक धक करने लगा’ (बेटा) या त्यांच्या गाण्यांसाठी त्यांना हे पुरस्कार प्राप्त झाले होते.


.. आणि माधुरीची साडीदेखील लिलावात विकली गेली!


1992मध्ये 'बेटा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेल्या माधुरी दीक्षितसोबतच अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आणि सरोज खान यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा पुरस्कार मिळाला होता. या गाण्याचे यश म्हणजे या चित्रपटात माधुरीने परिधान केलेल्या साडीचाही चॅरिटीसाठी 80 हजारांमध्ये लिलाव करण्यात आला होता.


बॉलिवूड सोडून का वळल्या भक्तिगीतांकडे?


शून्यापासून सुरुवात करणाऱ्या अनुराधा पौडवाल यांनी अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले. 1987मध्ये त्यांनी टी-सीरीज आणि सुपर कॅसेट म्युझिक कंपनी जॉईन केली. यानंतर त्यांनी संगीत विश्वात आणखी यश मिळवले. अनुराधा पौडवाल यांनी 'सडक', 'आशिकी', 'लाल दुपट्टा मलमल का', 'बहार आने तक', 'आई मिलन की रात', 'दिल है की मानता नहीं' यांसारख्या चित्रपटांसाठी अनेक हिट गाणी गायली. संगीत विश्वात लतादीदी आणि आशा भोसले यांच्या नावांचा बोलबाला असतानाच, अनुराधा पौडवाल यांनी आपला दबदबा निर्माण केला होता.


अनेक सुपर हिट बॉलिवूड गाणी देणाऱ्या अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) विशेष लक्षात राहिल्या त्या त्यांच्या भक्ति गीतांमुळे! त्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यावेळी त्यांनी बॉलिवूड म्युझिक सोडून पूर्णपणे भक्ति गीतांकडे वळण्याचा निर्णय का घेतला याविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या की, 'चित्रपटसृष्टीत नेहमीच दिग्दर्शक, निर्मात्यांच्या मूडवर किंवा एखादा चित्रपट हिट झाला की, नायक-नायिका यांच्या मूडवर गाणी मिळतात. त्यामुळे मला थोडंसं असुरक्षित वाटत होतं आणि मला भक्ती-भजन नेहमीच आवडायचे. म्हणूनच मी बॉलिवूड सोडले आणि भजने, भक्तीगीते गाऊ लागले.’ बॉलिवूड  कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी पूर्णपणे भक्तिगीतांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.   


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 27 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!