मुंबई : भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक जवानांनी वीरमरण पत्करलं. त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यदिन आपल्याला सैनिकांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देतो. स्वातंत्र्याचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी यंदा ‘फौजी’ (Fauji Marathi Movie 2024) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ चित्रपट येत्या 30 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे. 


शौर्य आणि संघर्षाची गाथा


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. देशाचे जवान आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असतात, त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. अशाच जवानांच्या शौर्यगाथेवर आधारित फौजी हा चित्रपट आहे. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर ‘फौजी’ चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.


'फौजी' 30 ऑगस्टला चित्रपटगृहात


शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा, तर संकलन विश्वजीत यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे यांनी सांगितलं की, आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती केली.


चित्रपटात झळकणार हे कलाकार


सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश  भोसले, संजय खापरे,  अश्विनी  कासार, शाहबाज  खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत. 


शान, वैशाली माडे आणि उर्मिला धनगरचा मधूर आवाज


'फौजी' मराठी चित्रपट (Fauji Marathi Movie) 30 ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार यांचं संगीत आणि उमेश रावराणे, सूरज कुमार यांनी पार्श्ववसंगीत दिलं आहे. शान, वैशाली माडे, उर्मिला धनगर, कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील, कौशल सिंग यांनी सांभाळली आहे.