Mangesh Desai On Dharmaveer 2 : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाचा दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. 


धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगला 27 डिसेंबर 2021 रोजी कोलशेत येथे सुरुवात झाली होती. या सिनेमाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने निर्माते मंगेश देसाई यांनी या सिनेमाच्या पुढच्या भागाची घोषणा केली आहे. हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


मंगेश देसाई म्हणाले,"धर्मवीरांच्या खूप गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत, अनेक भाग करूनदेखील त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग 2024 ला घेऊन येत आहोत. 'धर्मवीर' एका भागात संपणारा विषय नसून, तो एक खंड आहे". 


धर्मवीर सिनेमाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांची अखंड राजकीय कारकीर्द पाहायला मिळाली होती. या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघे यांचे निधन झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 






मंगेश देसाई पुढे म्हणाले,"धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक पैलू अद्याप गुलदस्त्यातच आहेत. त्यांच्या अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा आनंद दिघे नामक ज्वलंत व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर साकारणारा अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे". 


'धर्मवीर' सिनेमाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचं असून पहिल्या भागातील कलाकारांची फौज दुसऱ्या भागातदेखील आपापल्या व्यक्तिरेखेला न्याय देताना दिसून येणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील प्रवीण तरडे करणार आहेत. आता धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 


संबंधित बातम्या


Dharmaveer : बहुचर्चित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार टॉकीज प्रिमिअर