मुंबई : प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला दीड वर्ष उलटल्यानंतरही त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केरळचे तुरुंग महानिरीक्षक ऋषीराज सिंह यांनी श्रीदेवी यांची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र श्रीदेवीचे पती आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी असल्या भंपक गोष्टींवर चर्चा करण्याची इच्छा नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


'मला या मूर्खासारख्या गोष्टींवर चर्चा करायची नाही. अशा चर्चा होतच असतात, त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. मुळात हे कोणाच्या तरी कल्पनेला फुटलेले धुमारे आहेत' असं म्हणत बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांची हत्या झाल्याचा दावा फेटाळून लावला.

'परिस्थितीजन्य पुरावे पाहता श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झालेला नसून हत्या झाल्याचं दिसत आहे. माझे मित्र आणि दिवंगत फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. उमादातन यांनी पूर्वी मला सांगितलं होतं. मी श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयी कुतूहलापोटी विचारलं असताना त्यांनी ही माहिती दिली होती' असं ऋषीराज सिंह यांनी 'केरळ कौमुदी' या वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभामध्ये म्हटलं आहे.

24 फेब्रुवारी 2018 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. दुबईतील हॉटेल रुममधल्या बाथटबमध्ये बुडून त्यांना प्राण गमवावे लागले होते. श्रीदेवी सहकुटुंब एका लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. बोनी आणि त्यांची धाकटी मुलगी खुशी मुंबईला परतले, मात्र श्रीदेवी दुबईतच थांबल्या होत्या. त्यांना सरप्राईज देण्यासाठी बोनी पुन्हा दुबईला गेले.

श्रीदेवी बाथरुममधून बराच वेळ बाहेर न आल्यामुळे बोनी कपूर यांनी पाहिलं असतं त्या पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी श्रीदेवी यांना मृत घोषित केलं.