मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर येत्या एक-दोन दिवसात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. आता त्यावर बॉलिवूडच्या कलाकारांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलंय आणि लॉकडाऊन न लावण्याची विनंती केली आहे.


फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) च्या वतीने शुक्रवारी अशा आशयाचं एक पत्र लिहलं आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की गेल्या वेळच्या लॉकडाऊनमुळे फिल्म इन्डस्ट्रीला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. या क्षेत्रातले लाखो कामगारांवर तसेच कलाकारांना बेरोजगारीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागलंय. आता पुन्हा जर लॉकडाऊन लावण्यात आलं तर या क्षेत्रातल्या सर्वानाच मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे तसेच फिल्म इन्डस्ट्रीवर मोठं संकट येईल असंही या पत्रात सांगण्यात आलं आहे. 


गेल्या वेळच्या कोरोनाच्या काळात अनेक मोठ्या निर्मात्यांनी आणि कलाकारांनी बेरोजगारीचा सामना करणाऱ्या कामगारांना आर्थिक रुपात मदत केली आहे. त्यामुळे अनेकांना या काळात आधार मिळाला होता. आता यावेळी ते निर्माते आणि कलाकार या परिस्थितीत नाहीत की ते कुणाला आर्थिक मदत करू शकतील. त्यामुळे या वेळी पुन्हा लॉकडाऊन लागला तर परिस्थिती बिघण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे. 


गेल्या वेळच्या लॉकडाऊनमध्ये ज्यांनी आपली नोकरी आणि काम गमावलं त्यांना अजूनही काम मिळालं नाही. त्यामुळे आता ज्यांना काम मिळालंय त्यांनाही आपल्या रोजगाराला गमवावं लागेल असं या पत्रात म्हटलं आहे. 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 48 हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महत्वाच्या बातम्या :