Salman Khan: राज्यात एकीकडे बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला बिश्नोई गँगकडून आलेल्या धमक्यांचे प्रकरण ताजं असतानाच राजस्थानमधील जोधपुरमध्ये एक खळबळजनक प्रकार घडलाय. बिश्नोई समाजातील काही संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचे पुतळे जाळल्याचा समोर आलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावर हा संताप व्यक्त केल्याचा समजतंय. या आंदोलनाची दृश्य समाज माध्यमावर व्हायरल झाली आहेत. जोधपुरमध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय.


काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमानचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा करत बिश्नोई समाज पैसा आणि प्रसिद्धीसाठी त्याला लक्ष करत असल्याचं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान म्हणाले होते. याच वक्तव्यावर आक्षेप घेत बिश्नोई समाजातील संताप्त लोकांनी सलमान खान आणि सलीम खान या दोघांचे पुतळे दहन केल्याचं सांगण्यात येत आहे. 


लोकांची दिशाभूल करू नका 


जोधपुरमध्ये अभिनेता सलमान खान व सलीम खान यांचे पुतळे जाळण्यात आले. बिश्नोई गॅंग कडून धमकी प्रकरण ताजे असतानाच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काळवीट प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून बिश्नोई समाजातील  काही संतप्त लोकांनी या वक्तव्याचा निषेध वर्तवण्यासाठी ही कृती केल्याचं सांगण्यात येत आहे.


 






बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर सुरक्षा वाढवली 


राज्यात 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दकी यांची हत्या करण्यात आल्यानंतर तसेच बिश्नोई गँगने दिलेल्या धमक्यांमुळे अभिनेता सलमान खान याची सुरक्षा वाढवली होती. 65 बॉडीगार्डसह ओळखपत्र तपासण्या अशा कडेकोट बंदोबस्तात सलमान सध्या वावरत आहे. दरम्यान जोधपुरमध्ये बिश्नोई समुदायाने सलमान आणि सलीम खान यांच्या पुतळ्याचे दहन केल्याने पुन्हा हा विषय चर्चेचा ठरला आहे.


लॉरेन्स बिश्नोईच्या भावाची 'भाईजान'ला धमकी


लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अटकेत असलेल्या शार्प शुटरने दावा केला होता की, गेल्या कित्येक महिन्यांपासून सलमान खानला मारण्याचा कट रचला जात आहे. याआधी सलमान खानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने आता सलमान खानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सलमान खानला कोणत्याही परिस्थितीत माफी मागावी लागेल, असं म्हणत लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोई याने सलमान खानला निशाण्यावर धरलं आहे. सलमान खानने माफी मागितली नाही, तर त्याच्यावरील धोका कायम राहिलं, असंही त्याने म्हटलं आहे. 


"सलमान खानने माफी मागावी, नाहीतर..."


लॉरेन्स बिश्नोई यांचे चुलत भाऊ रमेश बिश्नोई म्हणाला की, संपूर्ण बिश्नोई समाज काळवीट प्रकरणावर लॉरेन्स बिश्नोईच्या पाठीशी उभा आहे. सलमान खानच्या कुटुंबाने आमच्या धार्मिक दुखावल्या आहे. आमच्या समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळ केल्यामुळे त्यांनी समाजाची माफी मागितली पाहिजे, असं त्याने म्हटलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे.