पटियाला: प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी  धरत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.पंजाबमधील पटियाला न्यायालायने हा निर्णय दिला.


न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केलं. मात्र काही वेळात दलेर मेहंदीला दहा हजाराचा जामीन  मंजूर करण्यात आला.

मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरला. त्याला  गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.

दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणी आरोप होते. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदीवर होता.

याप्रकरणी पहिला गुन्हा 2003 मध्ये अमेरिकेत दाखल करण्यात आला होता. मानव तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेतच पाठवण्यात आले. दलेर आणि शमशेर या बंधूंनी 10 लोकांना परदेशात ठेवल्याचा आरोप आहे.

दलेर मेहंदी आपल्या म्युझिक टीमसोबत लोकांना परदेशात पाठवत आणि त्याबदल्यात मोठी रक्कम मिळवत होता, असा आरोप आहे. परदेशात गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भारतातून नेलेल्या व्यक्तींना तो तिकडेच सोडून येत असे, असा आरोप आहे.

2003 मध्ये पटियाला पोलिसांनी दलेर मेहंदीचा भाऊ शमशेर मेहंदीला अटक केलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांच्या तपासात आश्चर्यकारक बदल झाले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दलेर मेहंदीवर अवैध आणि बेकायदेशीरपणे अनेकांना परदेशात नेल्याचा गुन्हा 2003 मध्ये दाखल झाला होता. दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर सिंह यांनी अनेक व्यक्तींना आपल्या म्युझिक टीमचे सदस्य दाखवून अवैधरित्या परदेशात नेलं आणि तिकडे त्यांना सोडलं. त्याबदल्यात त्यांनी मोठी रक्कम मिळवल्याचा आरोप आहे.

मेहंदी बंधूंनी 1998 -1999 दरम्यान हा सर्व प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यांनी 10 लोकांना परदेशातच सोडल्याचा आरोप आहे.

दलेर मेहंदी एका अभिनेत्रीसोबत अमेरिका दौऱ्यावर गेले, त्यावेळी तीन मुलींना सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये सोडल्याचा आरोप आहे. तर ऑक्टोबर 1999 मध्ये मेहंदी बंधूंनी अमेरिका दौरा केला, त्यावेळी तीन मुलांना न्यू जर्सीमध्ये सोडल्याचा आरोप आहे.

बख्शीस सिंह यांनी दोन्ही मेहंदी बंधूंविरोधात तक्रार दाखल केली होती.