निर्माते विश्वास जोशी यांनी आता दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. त्यांचा हा पहिला सिनेमा. सिनेमा कसा असायला हवा याची जाण त्यांना आहे. म्हणून कदाचित त्यांनी 'व्हाॅटस अप लग्न' दिग्दर्शित करायला घेतला असावा. आजच्या पिढीचे विचार मांडताना, करिअर आणि संसार यांच्या कात्रीत अडकलेल्या त्यांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. हा चित्रपट फ्रेश दिसावा, त्याची निर्मितीमूल्य उच्च असावीत याची पुरती काळजी घेण्यात आली आहे. पण मूळ कथा आणि पटकथा लिहिताना उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांचा योग्य मागोवा न घेतल्याने हा सिनेमा हट्टाने विनोदी होतो. शिवाय शब्दबंबाळही होतो.

आकाश हा आयटी कंपनीत उच्च पदावर काम करतो. अत्यंत साॅर्टेड असलेला आकाश नेटका आहे. त्याला शिस्त आहे. सतत कामात व्यग्र असणं त्याला आवडतं. तर इकडे अनन्या अभिनेत्री आहे. आंतरराष्ट्रीय नाटकात ती काम करते. तिचं वाचन चांगलं आहे. पण ती कमालीची बेशिस्त आहे. तर अशा दोघांची अपघाताने भेट होते. दोघांचा आयुष्याकडे पाहायचा अॅप्रोच एकमेकांना आवडतो आणि मग ते प्रेमात पडतात. दोघांनीही आपल्या करिअरला प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. दोघांचं लग्न होतं. आणि त्याचवेळी दोघांना करिअरमध्ये नव्या संधी येतात. अनन्याला टीव्ही सीरीअल मिळते. तिची शिफ्ट सकाळी 7 ते संध्याकाळी 7 होते. तर आकाशच्या कामाची वेळ दुपारी 2 ते 2 होते. त्यानंतर मग दोघांच्या नात्यात काय होतं.. त्याचे वाद कसे निर्माण होतात. त्यातून ते कसे बाहेर येतात, त्याची ही सगळी गोष्ट आहे.

मुळात व्यक्तिरेखा एकदा ठरवल्यानंतर त्यांची वर्तणूकही ठरते. म्हणजे, आकाश जर एका मोठ्या कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट असेल आणि तो वर्कोहोलिक असेल तर त्याचं प्रोफेशन त्यात सतत दिसत राहायला हवं. अनन्याचंही असंच. ती फक्त अभिनेत्री नाही. ती रंगकर्मी आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकली आहे. मग तिची मानसिकता कशी असेल, याचा विचार दिग्दर्शकाने करायला हवा होता. तुलनेत चित्रपटातले त्यांच्या तोंडी असलेले संवाद फार पोरकट वाटतात. अनन्याचं मनस्वी असणं उसनं आणल्यागत वाटतं. म्हणून हा सगळा खेळ वरवरचा होतो.

खरंतर पती-पत्नी नातेसंबंधावर भाष्य करताना, तो संवाद सूक्ष्म व्हायला हवा होता. तो उलट वरवरचा वाटत राहतो. अनन्याचा जाॅलीनेस दाखवण्याच्या नादात वापरलेले संवाद टीव्हीवरच्या सुमार विनोदी शोंची आठवण करुन देतात. यातली गाणी, छायांकन चांगलं आहे. पण आता तो फ्रेशनेस सर्वत्र पाहायला मिळतो. अभिनयाबद्दल बोलायचं तर वैभवचा आकाश डोळ्यातून व्यक्त झालाय. तो अनेकदा छान फील देऊन जातो. अनन्या साकारताना प्रार्थना बेहेरेने काही काही भाव छान दिलेत. पण तिचं वाढलेलं वजन सिनेमाभर दिसत राहतं. बाकी विद्याधर जोशी, विक्रम गोखले, इला भाटे यांचे अभिनय नेटके.

एकूणात हा प्रयत्न म्हणूनच या चित्रपटाकडे पाहायला हवं. हा विषय अधिक गहन पण महत्याचा असायला हवा होता. आजची पिढी ही कमालीची सजग आहे. आपण काय करतो, कसे वागतो याकडे त्यांचा लक्ष असतं. ते प्रतिबिंब या चित्रपटात दिसलं असतं तर आणखी मजा आली असती. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळतोय ओके ओके स्मायली.