Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawad) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. यावेळी   प्रशांत दामलेंना (Prashant Damle) टोला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"नेते कलाकारांसारखे परफॉर्मन्स करतात, परंतु तुमच्यासारखी कला आम्ही करू शकत नाही. कारण नाटकात लाईव्ह परफॉर्मन्स असतो". 


शकतमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"अखिल भारतीय नाट्यसंमेलनाला माझ्या मनापासून शुभेच्छा. कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम दरवर्षी आणि सतत 100 वर्ष करत राहणे, तसेच त्याबाबत कायम आकर्षण वाटणं हे मराठी माणसाचं रंगभूमीवरील प्रेम आहे. कोरोनामुळं हे शंभरावे नाट्य संमेलन उशिरा झाले, कदाचित नियतीला असं करायचं असेल की शंभराव्या नाट्य संमेलनाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे उपस्थित असावेत. म्हणूनच की काय नियतीने हे घडवलं असावं. काहीही असलं तरी मी आज इथं उपस्थित आहे, त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो. भारतीय नाट्यकलेला मोठी परंपरा आहे. मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक आव्हानांचा सामना केला आहे. आज ओटीटी आणि सोशल मीडियाच्या काळातही मराठी प्रेक्षक नाटक पाहायला गर्दी करतात. व्यावसायिकत नाटकांप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीदेखील बहरली आहे". 


तुमच्यासारखं आम्हाला जमायचं नाही; दामलेंना शिंदेंचं प्रत्युत्तर


प्रशांत दामलेंना टोला देत एकनाथ शिंदे म्हणाले,"प्रशांत दामले म्हणाले त्या अडचणी नक्की सोडवू. मात्र ते म्हणाले की नेते कलाकारांसारखे परफॉर्मन्स करतात, परंतु तुमच्यासारखी कला आम्ही करू शकत नाही. कारण नाटकात लाईव्ह परफॉर्मन्स असतो, ते आम्हाला जमायचं नाही. उगाचंच जिलेबीची तुलना चित्राशी केल्यासारखं होईल".


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले," मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक. नाटकाचं तिकीट काढणं म्हणजे कलावंतांचं कौतुक करणं आहे. मराठी रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. त्यामुळे ती सदैव ताजी राहीली आहे". 


एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,"रंगभूमीप्रमाणे राजकारणाही काही धाडसी प्रयोग केले जातात. आम्ही दीड वर्षापूर्वी असाच एक धाडसी प्रयोग केला. त्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल. आजही मराठी रंगभूमीवर अनेक दिग्गज काम करत आहे. रंगभूमीसाठी हजारोंनी योगदान दिलं आहे. प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. एका नाटकाचं यश हे शेकडो हाताचं असतं. गेल्या 100 वर्षात मराठी रंगभूमीने अपयशाचं काळोखही पचवला आहे. पण या वाईट काळातही रंगभूमीवर प्रयोग सुरू होते. तुम्ही रंगमंचावर आपली भूमिका चोख वठवली की प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देतात. आम्ही लोकसेवकाची भूमिका चोख बजावली की मतदार आम्हाला मतपेटीतून दाद देतात. शेवटी मेहनत दोघांना करायची आहे. सादरीकरण दोघांना करायचं आहे". 


शरद पवारांसमोरचं नाट्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं राजकीय नाट्य


अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या उद्घाटनादरम्यान एकनाथ एकनाथ शिंदेंनी विश्वास व्यक्त केला की,"दीड वर्षापूर्वी सत्ताबदलाचा पहिला अंक पार पडला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाचा दुसरा अंक सुरू आहे. आता निवडणुकांनंतर विजयाचा तिसरा अंक पार पडेल".


संबंधित बातम्या


Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर प्रशांत दामले म्हणाले, "मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय",जाणून घ्या नेमकं काय घडलं?