मुंबई : बॉलिवूडमधील हिरो नंबर वन म्हणून प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) ने काही दिवसांपूर्वी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. परंतु, यामध्ये सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, या शोमध्ये 'सपना'चं पात्र साकारून सर्वांचं मनोरंजन करणारा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) मात्र यावेळी दिसला नाही. कृष्णा अभिषेक हा गोविंदा यांचा भाचा. गोविंदा यांनी शोमध्ये हजेरी लावल्यानंतर कृष्णा शोमध्ये गैरहजर असल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. तेव्हापासूनच यादोघांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.


काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेकने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, 'आमच्यामध्ये काही मतभेद आहेत आणि आमच्यातील मतभेदांचा परिणाम शोवर व्हावा अशी माझी इच्छा नाही. कॉमेडी करण्यासाठी सकारात्मक वातावरणाची गरज असते. जेव्हा नाती चांगली असतात, तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. त्याचसोबत कृष्णाने या मतभेदांसाठी दोघांच्याही पत्नी जबाबदार असल्याचं सांगितलं होतं. आता या सर्व प्रकरणावर गोविंदा यांनी आपलं मौन सोडलं आहे.





गोविंदा (Govinda) संदर्भात ईटाइम्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, 'या संपूर्ण प्रकरणावर जाहीररित्या बोलणं योग्य वाटत नाही. परंतु, आता सत्य सर्वांसमोर येणं गरजेचं आहे. मी एक रिपोर्ट वाचला की, माझा भाचा कृष्णा अभिषेकने त्या टीव्ही शोमध्ये परफॉर्म केलं नाही. कारण मी तिथे पाहुणा म्हणून गेलो होत. त्यानंतर त्याने आमच्यातील मतभेदांबाबतही काही गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. त्याच्या बोलण्याच अनेक नाव खराब करणाऱ्या आणि अत्यंत वाईट वक्तव्य होती.' कृष्णा अभिषेक म्हणाला होता की, ज्यावेळी कृष्णाची दोन जुळी मुलं रयान आणि कृषांग यांचा जन्म झाला होता. त्यावेळी गोविंदा त्यांना भेटायला आले नव्हते. आपली बाजू मांडताना गोविंदा यांनी याबाबतही सांगितलं.


गोविंदा यासंदर्भात बोलताना म्हणाले की, 'मी माझ्या कुटुंबियांसोबत मुलांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. मी डॉक्टर्स आणि नर्स यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी नर्स मला म्हणाल्या की, कृष्णाची पत्नी कश्मीराला कोणालाही भेटण्याची इच्छा नाही. त्यानंतर आम्ही विनंती केल्यानंतर मुलांना दुरुन पाहण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात आली. आम्ही बाळांना पाहिलं आणि घरी परतलो. कदाचित कृष्णाला ही गोष्ट माहिती नसेल. त्यानंतर कृष्णा आपली मुलं आणि त्याची बहिण आरतीसोबत माझ्या घरीही आले होते. कदाचित कृष्णा हे सांगायला विसरला असेल.'


गोविंदा पुढे बोलताना म्हणाले की, 'कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा यांच्याकडून माध्यमांमध्ये त्यांची बदनामी करणारी वक्तव्य केली जात आहेत. मला खरंच माहिती नाही त्या दोघांना हे सगळं करून काय मिळणार आहे. कृष्णा लहानपणापासूनच माझा अत्यंत लाडका होता. परंतु, माध्यामांमध्ये या सर्व गोष्टी बोलून तो इतरांनाही बदनामी करण्याची संघी देत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :