मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर या दुर्मिळ कॅन्सरच्या इलाजासाठी लंडनमध्ये आहे. इरफान खानने फ्रान्सच्या असोस‍िएट प्रेस (AP) या वृत्तसंस्थेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रकृती आणि उपचारांविषयी माहिती दिली. कॅन्सरच्या उपचारांमुळे आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कसा बदल झाला हे त्याने सांगितलं. प्रत्येकाचं आयुष्य किती अनिश्चित आहे हे आता समजल्याचं इरफान म्हणाला.


एकीकडे फिल्म इंडस्ट्री आणि इरफानचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत, दुसरीकडे इरफाननेही स्वत:शी संबंधित एक सकारात्मक बातमी शेअर केली आहे. "केमोचे सहापैकी चार सेशन पूर्ण झाले आहेत. जेव्हा सहा सेशन पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा कॅन्सर स्कॅन होईल. मात्र तिसरं सेशन पूर्ण झाल्यावर पॉजिटिव्ह रिझल्ट आला आहे. तरीही सहाव्या सेशनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि तेव्हाच निकाल लागेल. मग पाहूया आयुष्य मला कुठे घेऊन जातं," असं इरफान म्हणाला.

आजार आणि उपचारांबद्दल इरफान म्हणाला की, "मी आयुष्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. आयुष्यात तुमच्यासमोर अनेक आव्हानं येतात, पण मला वाटतं की, हा माझ्यासाठी कठीण परीक्षेचा काळ आहे. मी आता एका वेगळ्या अवस्थेत आहे. सुरुवातीला मला आजाराबाबत समजलं तेव्हा धक्का बसला. पण मी आता स्वत:ला जास्त ताकदवान, ज्यास्त प्रोडक्टिव्ह आणि निरोगी समजत आहे."

"मी या आजारातून बरा होईन की नाही असं सुरुवातीला लोकांना वाटत होतं, कारण माझ्या हातात काही नाही. आयुष्याला जे मंजूर असेल तेच होईल. पण जे काही माझ्या हातात आहे, ते मी सांभाळू शकतो. आयुष्याने मला एवढं काही दिलंय की, त्याच्याप्रति कृतज्ञ असायला हवी. उपचारादरम्यान माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी आता अशा स्थितीत आहे की, मी 30 वर्ष जरी मेडिटेशन केलं असतं तरी इथे आलो नसतो," असं पुढे इरफान म्हणाला.

"आता मी माझ्या आयुष्याबद्दल कोणताही प्लॅन करत नाही, कारण जीवनात काहीही निश्चित नाही हे मला जाणवलं आहे," असं इरफानचं म्हणणं आहे. आपल्या उपचारांबद्दल इरफानने सांगितलं की, "माझ्या केमोचे चार सेशन झाले आहेत, मला एकूण सहा केमो सेशन घ्यायचे आहेत. तिसऱ्या सेशननंतर स्कॅन झालं होतं, ज्यात पॉझिटिव्ह साईन आले होते. परंतु योग्य परिस्थिती सहाव्या सेशननंतरच समजू शकणार आहे. पाहूया यानंतर आयुष्य मला कुठे घेऊन जातं. जगात कोणाच्याही आयुष्याची काहीच गॅरंटी नाही."

आपल्या या अनुभवाबद्दल इरफान खान म्हणाला की, "या परिस्थितिने मला एक प्रकारचं वेगळं ज्ञान दिलं आहे. तुम्ही विचार करणं, प्लॅनिंग करणं सोडून देता. तुम्ही आयुष्याच्या दुसऱ्या पैलूकडे पाहायला लागता. जीवन खूप काही देतं आणि यासाठी आपल्याला आभारी असायला हवं."