Cirkus Movie Review : रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा मसाला मनोरंजनात्मक चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या गोलमाल या चित्रपटाला प्रेक्षकांची विषेश लोकप्रियता मिळाली. त्याचे चित्रपट फक्त टाईमपास म्हणून नसतात तर त्यातून चांगलं मनोरंजन देखील होतं. मात्र, सर्कस (Cirkus) हा रोहित शेट्टीचा चित्रपट याला अपवाद आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीचा सर्वात बोरिंग चित्रपट आहे. या चित्रपटात कोणताही मसाला नाही. मनोरंजन नाही. 


चित्रपटाचे कथानक 


सर्कस चित्रपटाची कथा रॉय आणि रॉय यांची आहे. हे जुळे असतात. तसेच जॉय नावाची देखील जुळे व्यक्ती आहेत. या चार मुलांना अनेक अनाथ आश्रमात सोडण्यात येते. अनाथ आश्रमाचे केअर टेकर डॉ. मुरली शर्मा हे या मुलांना दोन वेगवेगळ्या कुटुंबात दत्तक देतात. म्हणजेच एक जॉय आणि रॉय एका कुटुंबात आणि एक जॉय आणि रॉय दुसऱ्या कुटुंबात. त्यानंतर जेव्हा ही मुलं मोठी होतात. तेव्हा खरा गोंधळ सुरु होतो. चित्रपटात पुढे काय होतं हे जर तुम्ही हा रिव्ह्यू वाचल्यानंतरही चित्रपट पाहायला गेलात तर तुम्हाला कळेल.     


या चित्रपटात एक रॉय म्हणजेच रणवीर सिंहला विजेचा झटका बसत नाही तर दुसऱ्याला विजेचा झटका बसतो. आणि प्रेक्षकांनाही हा चित्रपट पाहून एक झटकाच बसतो. चित्रपटाचे लेखन फारच वाईट आहे. संवादांमध्ये अजिबात दम नाही. एक-दोन सीन असतील जिथे तुम्हाला थोडं हसू येईल. हसणे तर सोडाच हा चित्रपट बघून तो रोहित शेट्टीचा चित्रपट आहे असे वाटतच नाही. रोहित शेट्टीने हा चित्रपट बनवला हे शेवटपर्यंत कळत नाही. असं वाटतं की हा चित्रपट बनवताना रोहित शेट्टीने पाहिलाच नाही. जर पाहिला असता तर कदाचित त्यामध्ये काही सुधारणा केल्या असत्या.


अभिनय 


रणवीर सिंह हा एक अप्रतिम अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने एकापेक्षा एक सर्रास व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण इथे त्याच्या अभिनयात कोणतीही ताकद दिसत नाही. चित्रपट पाहाताना रणवीरची स्टाईल, त्याचं अस्तित्वच दिसत नाही. वरूण शर्माने फुकरे चित्रपटात  अप्रतिम काम केलं आहे. पण इथे तो एकदम वाईट अभिनय करताना दिसतोय. त्याला बघून एकदाही हसू येत नाही. पूजा हेगडेचं काम छान आहे. पण तिच्या भूमिकेतही फारसं खास काही नव्हतं. जॅकलीनने तेच केलं आहे जे काम ती आतापर्यंत करत आली आहे. तिच्या अभिनयात कोणतीही ताकद दिसून येत नाही. संजय मिश्रा यांच्या कॉमिक टायमिंगने आपल्याला नेहमीच हसू येतं. सिद्धार्थ जाधवने चांगलं काम केलं आहे. याशिवाय जॉनी लिव्हर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, ब्रजेश हिरजी, मुकेश तिवारी असे अनेक कलाकार चित्रपटात आहेत. पण यापैकी एकाही कलाकाराने यया चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडलेली नाही. कोणत्याच कलाकाराचा योग्यरित्या वापर करण्यात आला नाही. 


दिग्दर्शन 


रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात यावेळी काहीच ताकद दिसून आली नाही. चित्रपटाची कथा ही 60 ते 70 च्या दशकातील आहे. मात्र, चित्रपट पाहताना असे कुठेच जाणवत नाही. बेंगळुरू आणि उटी कुठेही नीट दाखविण्यात आलेले नाहीत. सेट पूर्णपणे बनावट वाटतायत. कलाकारांची एवढी मोठी गर्दी का जमली हे समजण्यापलीकडचे आहे. ते पाहता रोहित शेट्टीने स्वतः दिग्दर्शन केले असेल असे वाटत नाही.


चित्रपटाच्या संगीतातही फारशी ताकद दिसून येत नाही. सध्याचं 'करंट लगा' गाणं सोडलं तर कोणतंही गाणं लक्षात राहत नाही.  


महत्त्वाच्या बातम्या : 


Abhishek Bachchan: 'अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांइतका टॅलेंटेड नाही' तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट; अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!