Maharashtra Karnataka Border Dispute : सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करून सीमावादात (Maharashtra Karnataka Border Dispute) तेल ओतत असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची खासदार धैर्यशील माने यांनी थेट पीएम मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. धैर्यशील माने यांनी आज पंतप्रधानांची भेट घेत बोम्मई सातत्याने करत असलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत सगळा विषय त्यांच्या कानी घातला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शाह यांच्या शिष्टाईनंतर ही अशा पद्धतीची विधान होत असतील तर ते चुकीचं असल्याचे धैर्यशील माने यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयात उभयंतात भेट झाली. 


धैर्यशील माने यांनी सीमाभागात जाताना माझ्यासह काही मंत्र्यांना अडवण्यात आलं, याचाही उल्लेख पत्रकात केला आहे. कर्नाटकात जाण्यासंदर्भात अधिवेशन संपलं की लवकरच आम्ही नवीन तारीख जाहीर करू, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.  


धैर्यशील माने यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर एबीपी माझाशी संवाद साधला, ते म्हणाले की, शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत माहिती द्यायची होती. तसेच सध्या चिघळत चाललेल्या सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Dispute) मी त्यांची मुद्दामहून भेट घेतली. या भेटीत सविस्तर वृत्तांत त्यांची कानी घालून होत असलेल्या वक्तव्यांची माहिती दिली. सीमाभागातील काय स्थिती आहे, सीमावासियांच्या काय भावना आहेत याची त्यांनी माहिती घेतली. मागील आठवड्यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तसेच उपमुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होऊनसुद्धा खालच्या स्तरावर वक्तव्ये केली जात आहेत. काल, तर कर्नाटकच्या विधानसभेत त्याची वाच्चता झाली हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या वक्तव्याने सीमावासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सूचना आपण द्याव्यात, जेणेकरून सीमावासियांवर कोणतेही दडपण येऊ नये. 


Maharashtra Karnataka Border Dispute : बोम्मईंच्या वल्गना थांबेनात


दरम्यान, बोम्मईंच्या वल्गना सुरु असताना महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्याविरोधात नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. काल कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, अशी वल्गना केली. तसेच महाराष्ट्राच्या निषेधाचा ठरावही पास करण्यात आला. बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) संपला आहे. महाराष्ट्राकडून तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीकडून राजकीय लाभासाठी कुरापती काढल्या जात आहेत. त्यांनी अक्कलकोट आणि जतमधील जनतेला पहिल्यांदा संरक्षण द्यावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्राच्या सीमासमन्वयक मंत्र्यांना रोखले. एकीकरण समितीकडे जनतेनं पाठ फिरवली असून त्यामुळे काळादिन, महामेळावा घेण्यापलीकडे त्यांच्याकडे काम नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या