मुंबई : हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या आणि कलाविश्वासमवेत राजकीय वर्तुळातही तितक्याच सराईतपणे वावरणाऱ्या जया बच्चन या आता एका वेगळ्या प्रवासाची सुरुवात करत आहेत. हा प्रवास, किंबहुना ही वळणं त्यांच्यासाठी नवी नाहीत. पण, तरीही अनेक वर्षांनंतर त्या या विश्वात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. मुख्य म्हणजे सिनेरसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. 1973 मध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर जया बच्चन यांनी कलाविश्वापासून काहीसं अंतर ठेवलं. खासगी जीवनाला, कुटुंबाला त्यांनी दरम्यानच्या काळात प्राधान्य दिलं.


'कभी खुशी कभी गम', 'सिलसिला' या चित्रपटांतून त्या झळकल्याही. रुपेरी पडद्यावर त्या अखेरच्या रितूपर्णो घोष यांच्या 'सनग्लास' या चित्रपटात त्यांनी अखेरचं काम केलं होतं. जिथं त्यांनी नसिरूद्दीन शाह यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. पण, काही कारणास्तव त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

आता मात्र त्या पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पूर्णवेळ सक्रिय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जया बच्चन या त्यांची ही नवी इनिंग थेट मराठी कलाविश्वातून सुरु करणार आहेत. मराठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातून त्या झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'शेवरी', 'अनुमती' या आणि अशा जवळपास 50 चित्रपटांचं दिग्दर्शन अहिरे यांनी केलं आहे. अवघ्या 20 दिवसांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं आता चित्रपटच रसिकांसमवेत अनेकांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Silsila पाहून संतापलेले Amitabh Bachchan, 19 वर्षे दिग्दर्शकाशी अबोला

आजवर हिंदी चित्रपट विश्वात नावलौकिक मिळवणाऱ्या अनेक कलाकारांनी मराठी कलाविश्वातही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. किंबहुना प्रेक्षकांनीही अशा कलाकारांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळं आता जया बच्चन यांच्या नव्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.